चंद्रपूर – चंद्रपूरमधील एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील एका गावात माय-लेकींचा अन्नावाचून तडफडून मृत्यू झाला आहे. गोंडपीपरी तालुक्यातील कोठारी येथे झेलाबाई पोचू चौधरी (वय 73) व तिची मुलगी माया मारोती पुलगमकर (वय 45) यांचा शनिवारी मृत्यू झाला.
दोघींचा भूकेने आणि आजाराने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वीच झेलाबाई चौधरी यांचे पती पोचू चौधरी यांचे निधन झाले होते. तेव्हापासून दोघी मायलेकी एकत्र राहत होत्या.
गेल्या अनेक महिन्यापासून या मायलेकी आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्याकडून कुठलीही कामे होत नव्हती. तसेच बऱ्याच वेळी त्यांना काही खायला देखील मिळत नव्हते. मृत्यूच्या अगोदर काही दिवस पोटात अन्नही नसल्याची प्राथमिक माहिती आहे. ग्रा.पं. कार्यालयात याची माहिती मिळताच सरपंच मोरेश्वर लोहे व सहकारी घटनास्थळी पोचले.
पोलिस प्रशासनाला माहिती देत मृतदेहाचे पंचनामा करण्यात आले. यात संशयास्पद असे काहीही आढळून आलेले नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. ग्रामस्थांनी दोन्ही मृतदेह गावात पोचताच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. या प्रकरणाचा अधिक तपास कोठारी पोलीस करत आहेत.