प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 17 -संस्था चालविणे सोपे नाही. मग ती कोणतीही असो. पण, योग्य काळजी घेतली, तर धर्मादाय कार्यालयातील अडचणींना तोंड द्यावे लागत नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार, संस्थाचालक व धर्मादाय कार्यालय यांच्यात सुसंवाद होणे आवश्यक आहे. दरवर्षी अडचणींसंदर्भात बैठक घेऊन कायमस्वरुपी यंत्रणा राबविणे गरजेचे आहे, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
“पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन’च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त “विश्वस्त परिषद 2022’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार गिरीष बापट, राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन, असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. शिवराज कदम जहागिरदार, उपाध्यक्ष मोहन फडणीस, सचिव सुनिल मोरे, खजिनदार रजनी उकरंडे, विश्वस्त मुकेश परदेशी, हेमंत फाटे, दिगंबर देशमुख, सतिश पिंगळे, रंगनाथ ताठे, राजेश ठाकूर, गायत्री पंडित आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, सामाजिक संस्थांकडील समाजाचा पैसा खर्च करताना धर्मादाय आयुक्तालयाची परवानगी असणे आवश्यक आहे. मात्र, त्या यंत्रणेमध्ये सुलभता हवी. खासदार बापट म्हणाले की, धर्मादाय आयुक्तालयाच्या पुणे विभाग कार्यालयाची अपुरी जागा ही अडचण आहे. याशिवाय पदांची मान्यता असूनही, केवळ 60 लोकांवर काम सुरू आहे. पुण्यामध्ये 75 हजार संस्था असून त्यांचे प्रश्न कार्यालयाद्वारे सोडविले जातात. यावेळी महेंद्र महाजन, ऍड.शिवराज कदम जहागिरदार यांनी मार्गदर्शन केले. ऍड. सागर थावरे यांनी स्वागत केले. ऍड. दिलीप हांडे यांनी प्रास्ताविक केले. ऍड. अमृता गुरव यांनी आभार मानले. तर प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.