राजगुरूनगर (प्रतिनिधी) :- पुणे जिह्यात सहकारात अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बॅंकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र कांबळे यांनी दिली.
राज्यातील सहकारी बॅंका, विविध कार्यकारी सोसायटी, पतसंस्थासह 250 सभासदापेक्षा जास्त संख्या असलेल्या गृहनिर्माण सस्था पंचवार्षिक निवडणुका 30 सप्टेबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने अतिवृष्टी व पावसाळ्याचे कारण देत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील नावाजलेल्या राजगुरूनगर बॅंकेची निवडणुकीचा कार्यक्रम सुरु होता. (दि.15) उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र) दाखल होण्याच्या शेवटच्या दिवशीच शासनाने निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. निवडणुकीतील छाननी प्रक्रिया आणि माघारीची प्रक्रियेला गती न मिळाल्याने पुढील अडीच महिन्यानंतर आता ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. प्रचारासाठी सज्ज झालेल्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले.
अवघे 79 अर्ज दाखल
राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत 11 ते 15 जुलैअखेर 44 उमेदवारांनी 79 नामनिर्देशन पत्र दाखल झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक हरिश्चंद्र काबंळे यांनी दिली. 142 नामनिर्देशन पत्राची विक्री होऊनही अवघे 79 अर्ज दाखल झाल्याने निवडणुक जाहीर झाल्यापासून निवडणुकीत शंभरहुून अधिक उमेदवार निवडणुकीत उतरणार असल्याचा अंदाज मात्र फोल ठरला.
निवडणुकीच्या अनुषंगाने सभासद, अनुमोदक, उमेदवार, सूचक, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी परिपत्रकानुसार आचारसंहितेचे पालन करावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी हरिश्चंद्र काबंळे यांनी सांगितले. यावेळी ही निवडणूक विद्यमान संचालकविरोधी नवीन इच्छुक सभासद यांच्यात होती.
निवडणूक पूर्ण होईपर्यंत आचारसंहिता
शुक्रवार (दि.15) ही बॅंकेच्या निवडणुकीतला नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा दुपारी तीनपर्यंत मुदत संपल्यावर राज्य शासनाने सध्या राज्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे सहकारातील सर्व निवडणुकांना 30 सप्टेबरपर्यत स्थगितीचा आदेश काढल्यामुळे राजगुरूनगर बॅंकेच्या निवडणुकीची पुढील प्रक्रिया थाबंवली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने 15 जून 2022 रोजी परिपत्रकानुसार राजगुरूनगर बॅंकेची निवडणूक 11 जुलैपासून ते निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईतोपर्यत आचारसंहिता लागू झाली आहे.
निवडणुकीत 2 पॅनल होणार असल्याचे निश्चित झाले होते. यामुळे निवडणुकीत चुरस वाढली होती. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत निवडणूक पुढे ढकलल्याने पुढे काय करिष्मा घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजगुरूनगर बॅंकेची निवडणूक प्रक्रिया सुरु असतानाच निवडणूक पुढे गेल्याची घटना बॅंकेच्या इतिहासात प्रथमच घडली आहे. या प्रक्रियेविरोधात काही संचालक हे न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.