नागपूर – जगामध्ये जिथे-जिथे हुकुमशाही आली, ती लयास गेली. श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात सामान्य लोकं घुसली आणि सत्ताधारी कुटुंब देशाबाहेर निघून गेले आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर केल्यास जनता त्याविरोधात आवाज उठवतात, हे श्रीलंकेत दिसून आले, असा इशारा देतानाच भारतातही जे काही घडत आहे, त्याची चिंता न करता आपण एकसंध राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी केले.
नागपूर येथील आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, आम्ही केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात सातत्याने आवाज उठवत आहोत. त्याची जबरदस्त किंमत आमच्या नवाब मलिक व अनिल देशमुख या दोन सहकाऱ्यांना मोजावी लागली आहे. आज ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांनी सत्ता केंद्रीत करुन विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांचे राज्य पाडून भाजपचे राज्य आणले. कर्नाटकातदेखील आमिषे दाखवून कॉंग्रेसचे सरकार घालवले. त्यानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचे काही लोक हाताशी धरून राज्यात चांगले काम करणारे सरकार बाजूला केले. आज ठिकाठिकाणी अधिकारांचा गैरवापर केला जात असून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. पण हे जास्त काळ चालणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी भाजपला दिला.
हा खासदारांचा लोकशाहीतील अधिकार
आज दिल्लीत खासदारांसाठी एक अध्यादेश काढण्यात आला आहे. संसदेत काम करत असताना सभागृहात जर खासदारांचे म्हणणे सरकारने ऐकले नाही तर खासदार पुन्हा-पुन्हा आपली बाजू मांडतात. सरकारने लक्ष दिले नाही तर खासदार सभात्याग करुन, बाहेर जाऊन महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करतात. हा खासदारांचा लोकशाहीतील अधिकार आहे. पण आता खासदारांना संसदेच्या आवारातही आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यास बंधन घालण्यात आले आहे, याबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.