जळगाव – उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतानाही सत्तर वर्षात उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री पद मिळाले नाही. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे नाशिक जळगाव जिल्ह्यातील एकालाही संधी मिळाली नाही. कोकणात संधी मिळाली. मराठवाड्यात चार चार मुख्यमंत्री झाले.विदर्भात चार चार मुख्यमंत्री झाले. उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्याची पात्रता असतानाही एकालाही मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही हे उत्तर महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले, खडसे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहे हे समजल्याबरोबर माझी छळवणूक करण्यात आली. माझे दाऊदच्या बायकोबरोबर संबंध जोडण्यात आले. खोटा भूखंड, ईडी प्रकरण असे अनेक आरोप माझ्यावर लावण्यात आले. मुख्यमंत्रिपदाचा दावेदार होतो म्हणून रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून माझे फोन टॅपिंग करण्यात आले. माझे तिकीट नाकारण्यात आले. मात्र उत्तर महाराष्ट्रावर होणारा अन्याय छळणवणूक कधी ना कधी भरून निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नसल्याचा उल्लेख केला होता त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी काल विधानसभेत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना उपरोधिक टोला लगावला होता. उत्तर महाराष्ट्रात स्वर्गीय बळीराम हिरे, रोहिदास पाटील, मधुकरराव चौधरी आणि एकनाथ खडसे यांच्यासारखे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतानाही त्यांना मुख्यमंत्री पद मिळू शकले नाही.
देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जातील त्यानंतर गिरीश महाजन यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळेल असा उपरोधिक टोला अजित पवार यांनी लगावला होता. त्यावर ही वस्तुस्थिती आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले. यासंदर्भात मी मुख्यमंत्रिपदाचा दावेदार आहे हे समजताच माजी छळवणूक करण्यात आली, असेही त्यांनी निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला.