महाराष्ट्राच्या लाऊडस्पीकर वादाचा आवाज आता देशाच्या विविध भागात पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातही हा वाद जोर धरताना दिसत आहे. यूपीच्या अलीगढमध्ये युवा क्रांती मार्चच्या कार्यकर्त्यांनी गांधी पार्क परिसरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण केले. मशिदींतील लाऊडस्पीकर कमी करण्यासाठी आम्ही प्रशासनाला यापूर्वी निवेदन दिले होते, असे युवा क्रांती मंचचे म्हणणे आहे. मात्र आमच्या निवेदनावर अद्याप कोणताही प्रतिसाद आला नसल्यामुळे हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले असल्याचे युवा क्रांतीकडून सांगण्यात आले आहे.
युवा क्रांती मंचचे सरचिटणीस शिवांग तिवारी म्हणाले की, आम्ही प्रत्येक चौकाचौकात लाऊडस्पीकर लावण्याचे काम करू. हुनमान चालिसाचे पठन सकाळी 5 वाजता व संध्याकाळी 5 वाजता या वेळेत केली जाणार. अजानच्या वेळेतच हनुमान चालीसा व आरती करण्यात येईल असे तिवारी यांनी सांगितले आहे.
अलीगढमध्ये ABVPने 21 चौकात लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याची परवानगी मागितली आहे. आता ABVPने प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. ABVP चे माजी नेते बलदेव चौधरी म्हणाले की, जर प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली नाही आणि त्यासाठी कोणतेही ठोस कारण दिले नाही तर आम्ही येत्या मंगळवारी म्हणजेच 19 तारखेला परवानगीशिवाय लाऊडस्पीकर लावू.
दरम्यान, अलिगढमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याबाबत आणि प्रशासनाला अल्टिमेटम देण्याबाबत मंत्री धरमपाल सिंह यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते मीडियावर संतापले. विनाकारण हा वाद निर्माण केला जात असल्याचे धरमपाल सिंह म्हणाले आहेत. तुम्ही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आसल्याचेही ते म्हणाले.