गुंडाप्पा विश्वनाथ यांनी व्यक्त केली भावना
बेंगळूर -परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या 1982-83 साली झालेल्या मालिकेत माझ्या धावा झाल्या नाहीत त्यामुळे मला संघातून वगळण्यात आले. तो क्षण माझ्यासाठी खूप वेदनादायी होता, अशा शब्दात भारतीय संघाचे माजी कसोटीपटू गुंडाप्पा विश्वनाथ यांनी आपली खंत व्यक्त केली.
कारकीर्द ऐन भरात असतानाही मला त्या सहा कसोटी सामन्यांच्या मालिकेत फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मात्र, प्रत्येक खेळाडूच्या कारकिर्दीत असा एखादा बॅडपॅच येतच असतो. मला या मालिकेनंतर संघातून वगळले गेल्यामुळेच मला 1983 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळता आले नाही. ही खंत मला आयुष्यभर वाटत राहील. ही मालिका एखाद्या भयानक स्वप्नासारखीच ठरली. खरेतर इतक्या लवकर कारकीर्द संपुष्टात येईल असे वाटले नव्हते, असेही विश्वनाथ म्हणाले.
चंदू बोर्डेंमुळेच संधी
न्युझीलंडविरुद्ध 1968 साली झालेल्या अध्यक्षीय संघाच्या सामन्यात मला संधी मिळाली. त्यावेळी माजी कसोटीपटू चंदू बोर्डे कर्णधार होते. त्यांनी माझा खेळ पाहिला व इरापल्ली प्रसन्ना आणि मन्सुर अली खान पतौडी यांच्याकडे माझी शिफारस केली. या दोन्ही खेळाडूंनी बोर्डेंच्या शब्दाला मान देत मला भारतीय संघात स्थान देण्यासाठी पाठिंबा दिला. बोर्डे यांच्यामुळेच मला आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली, असेही विश्वनाथ यांनी सांगितले.