हिमांशू
राम कृष्ण हरी! यंदा ना मृदंग, ना टाळ, ना “पुंडलिक वरदा..’चा गजर. ना दिवेघाटातल्या गर्दीची दृश्यं, ना उभं रिंगण, ना गोल रिंगण. ना माउलींच्या पादुकांचं नीरा स्नान, ना अश्वाची दौड, ना भागवत्धर्माची पताका खांद्यावर घेऊन चालणाऱ्या वारकऱ्यांच्या भेगाळलेल्या पावलांचं दर्शन.
बघता-बघता आषाढी एकादशी आली. पालखीमार्गाला यंदा सवयीची गर्दी दिसलीच नाही. “पंढरीनाथाची इच्छा’ म्हणून माळकऱ्यांनी वस्तुस्थिती प्रसाद समजून स्वीकारली. पण मनाची चलबिचल थांबता थांबेना. पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही, एवढ्यापुरतीच ही चलबिचल मर्यादित राहिलेली नाही. ठप्प झालेलं जग पुन्हा कधी आणि कसं वेग पकडणार, या महत्त्वपूर्ण प्रश्नाचा गुंता सुटता सुटेनासा झालाय.
कुणी म्हणे, लस तयार झाली. कुणी म्हणे, लस तयार झाली तरी उपयोग होणार नाही. कुणी म्हणे, एमएमआरची लस टोचली तरी भागेल… तसा अनुभवही आहे; पण करोनावरची लस विकून बक्कळ पैसा कमवू पाहणाऱ्या कंपन्या हे होऊ देणार नाहीत. कुणी म्हणे, प्लाझ्मा थेरेपी उपयुक्त आहे तर कुणी म्हणे, हर्ड इम्युनिटीला आता पर्यायच नाही. कुणी म्हणे, व्हायचं ते होऊ द्या; पण लॉकडाऊन वगैरे संपवा. अन्यथा आजारापेक्षा उपासमारीनं अधिक मृत्यू होतील. कुणी म्हणे, सामूहिक संक्रमणाचा काळ सुरू झालाय तर कुणी म्हणे, हा तिसरा टप्पा अजून दूर आहे.
या “कुणी म्हणे’च्या घोषात यंदा “नामा म्हणे, तुका म्हणे’चा घोष दबून गेला. आज सगळ्यांचा उपास. अगदी मुलाबाळांचाही! आपण पास की नापास हे माहीत नाही; पण उपास मात्र धरलाय एकादशीचा! “पांडुरंगा, माझा महाराष्ट्र करोनामुक्त कर. भरपूर पाऊस दे; पण पूर येऊ देऊ नको,’ असं गाऱ्हाणं मुख्यमंत्री विठुरायाला घालतीलच; पण विठुरायाच्या मनात नेमकं काय आहे हे यंदा कुणालाच समजेना.
अठ्ठावीस युगं विटेवर उभा राहून त्या पंढरीनाथानं केवळ वारकऱ्यांचीच पावलं मोजली असतील का? आपली वाकडी पडलेली पावलंही त्यानं टिपली असतीलच ना? एरवी माणसाच्या शरीराला कधीच स्पर्श न करणारे विषाणू त्यानं आपल्या इतक्या जवळ येऊ दिले असते का? वारीचा आषाढ, व्रतवैकल्यांचा श्रावण, गणपतीबाप्पांचा भाद्रपद, नवरात्रीचा अश्विन आणि दिवाळीचा कार्तिक हे पाठोपाठ येणारे महिने इतके अस्थिर कसे झाले? मुळात आपणच अस्थिर होऊन गेलो आहोत.
हा आजार कधी जाईल याविषयीही कुणी खात्रीनं सांगू शकत नाही आणि अर्थव्यवस्थेसोबत आपली दिनचर्या कधी रुळावर येईल, याचाही कुणाला अंदाज लागेना. हातावरचं पोट असणाऱ्यांची घराच्या दिशेनं “पायी वारी’ केव्हाच होऊन गेली आणि आता त्यांचा “उपास’ सुरू झालाय.
पांडुरंगानं आपल्याला यंदा खूपच बुचकळ्यात टाकलंय ना? स्वतःची सेवाही करून घेतली नाही आणि आपल्याला दर्शनही दिलं नाही त्यानं! परंतु आपल्याला अप्रत्यक्षपणे एक सांगावा मात्र दिलाय. योगायोगानं यंदा आषाढी एकादशी एक जुलैला आलीय. हा राष्ट्रीय डॉक्टर दिन.
महाराष्ट्रात तोच कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. संकट आलंच तर आणि संकट येऊच द्यायचं नसेल तर विठ्ठलरूप कुणामध्ये पाहावं, याचं दिग्दर्शनच पांडुरंगानं केलंय, असं का म्हणू नये?