गुजरात आणि हिमाचलच्या निवडणुकीला “मोदी विरुद्ध राहुल’ असा रंग देण्याचा डाव भारतीय जनता पक्षानं आखला होता. मात्र, गुजरातमध्ये केजरीवाल आणि हिमाचलमध्ये प्रियंका गांधी यांनी दंड थोपटल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे सर्व फासे उलटे पडले!
दिल्ली राज्य निवडणूक आयोगानं आता दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांची निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक फार आधी व्हायला हवी होती. मात्र, वॉर्ड पुनर्रचनेचे काम सुरू होते. यामुळे निवडणूक घेण्यास उशीर झाला असल्याची माहिती आयोगाने दिली. दिल्ली महानगरपालिकेसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान केले जाणार आहे. अर्थात, गुजरातमध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर दिल्लीत मतदान होईल. दिल्लीच्या निकालामुळे गुजरातची निवडणूक प्रभावित होऊ नये म्हणून महानगरपालिकेची निवडणूक लांबविली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा केला होता, हे येथे उल्लेखनीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरात आणि भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचे गृहराज्य हिमाचल प्रदेशात निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता आहे आणि सत्ताधारी पक्षाला सत्ताच्युत करण्यासाठी कॉंग्रेस आणि आम आदमी पक्ष मैदानात उतरला आहे. थोडक्यात, सांगायचं एवढंच की, दोन्ही राज्यांत लढत तिरंगी आहे. हे खरं असलं तरी, गुजरातमध्ये भाजप विरुद्ध आप आणि हिमाचलमध्ये भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशीच मुख्य लढत होणे आहे.
राजकारण आणि निवडणूक म्हणजे डावपेचाची आखणी. कट-शहचा खेळ. यात भारतीय जनता पक्षाचा “प्लॅन-ए’ फसला अशी चर्चा आहे. दोन्ही राज्यांची निवडणूक “मोदी विरुद्ध राहुल’ अशी व्हावी अशी भाजपच्या थिंक टॅंकची इच्छा होती. यासाठी व्यूहरचना तशीच केली गेली. मात्र, राजकारण म्हणजे अनिश्चिततेचा खेळ असतो, हेही तेवढंच खरं आहे. कॉंग्रेसनं महासचिव प्रियंका गांधी यांना हिमाचल प्रदेशात प्रचाराचा मुख्य चेहरा बनविला. त्यांना स्टार प्रचारक बनविण्यात आलं. येथे 12 नोव्हेंबरला मतदान आणि 8 डिसेंबरला निकाल असा निवडणुकीचा कार्यक्रम आहे. कॉंग्रेसनं येथे “नहले पे दहला’ फेकला आहे. हिमाचल प्रदेशची निवडणूक 2019 च्या लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकांप्रमाणे “मोदी विरुद्ध राहुल’ करण्याचा भाजपचा प्रयत्न होता.
कारण निवडणूक “मोदी विरुद्ध राहुल’ अशी झाली तर हिमाचल जिंकणे खूपच सोपे होईल, असं भाजपला वाटत होते. मात्र, कन्याकुमारी ते काश्मीर या 3500 किलोमीटरच्या “भारत जोडो यात्रे’मध्ये राहुल गांधी यांनी स्वतःला पूर्णपणे व्यस्त करून घेतले आणि इकडे, प्रियंका गांधी यांना पुढं केलं. राहुल गांधी दिल्लीत बसून राहिले असते आणि निवडणुकीचा प्रचार केला नसता तरी भाजपच्या हाती आयते कोलीत लागले असते. परंतु, येथेही भाजपच्या हाती काहीच लागले नाही. प्रियंका गांधी कॉंग्रेसचा मोठा चेहरा तर आहेच शिवाय महिला आहेत. यामुळे त्यांच्यावर हल्ला चढविताना भाजपला खूप विचार करावा लागत आहे. राजकीय टीका आणि टोमणेबाजी भाजप सध्या टाळत आहेत. राज्यात विधानसभेच्या 68 जागा आहेत. 2017 च्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला 21 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 44 जागा मिळाल्या होत्या. तीन जागा इतरांना गेल्या. भाजपची मते 48.79 टक्के आणि कॉंग्रेसची 41.68 टक्के होती.
प्रियंका गांधी राजकीयदृष्ट्या समजूतदार आणि कोणत्याही घटनेला पक्षाच्या बाजूने वळविण्यात आता माहीर झाल्या आहेत. हिमाचलमधील पक्षाच्या नेत्या प्रतिभा सिंग यांनी सुरुवातीला हायकमांडवर तोंडसुख घेतले होते. परंतु, प्रियंका गांधी यांनी लगेच डॅमेज कंट्रोल केले. प्रियंका गांधी यांनी हिमाचल प्रदेशमध्ये पहिली रॅली घेतली ती त्यांच्याच भागात.
भाजप किंवा कॉंग्रेसकडून हिमाचलची निवडणूक एकतर्फी आहे दावा केला जात आहे. परंतु हे सत्य नाही. मुकाबला अटीतटीचा आहे. प्रतिभा सिंग यांनी कॉंग्रेसला स्पर्धेत आणले आहे. तर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यानुसार, राज्यात कॉंग्रेसला स्थान नाही. भविष्य नाही. तो पक्ष भूतकाळातील गोष्ट आहे. हिमाचलमध्ये भाजप खूप मजबूत आहे. अनेक विकासकामे झाली आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षाची संघटना एकसंध आणि मजबूत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिमाचल प्रदेशातील जनता या दोघांचेही एकमेकांबद्दल अतोनात प्रेम आहे. याचा मोठा फायदा भाजपला होणार आहे.
गुजरातमध्ये भाजपचा विकास आणि कॉंग्रेस तसेच आपच्या महागाई, भ्रष्टाचार आणि प्रशासनातील काटेकोरपणाच्या मुद्द्यांवर राज्यातील 4 कोटी 90 लाख मतदान आपला कौल देतील. यात पुरुष 2 कोटी 53 लाख तर महिला 2 कोटी 37 लाख आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 1417 आहे. 11 लाख 62 हजार नवीन मतदार आहेत. सर्वाधिक (59.9 लाख) मतदार अहमदाबादमध्ये आहेत, तर सर्वात कमी (1.93 लाख) डांगमध्ये आहेत.
कॉंग्रेस पक्ष 27 वर्षांपासून पासून गुजरातच्या सत्तेबाहेर विरोधी बाकावर बसून आहे. यानंतरच्या निवडणुकीत 1990 मध्ये कॉंग्रेसला फक्त 33 जागा मिळाल्या होत्या. तेव्हापासून गुजरातमध्ये भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशी लढत होत आहे. प्रत्येक निवडणुकीत भाजप सत्तेच्या सिंहासनावर जाऊन बसतो आणि कॉंग्रेसला नाईलाजाने विरोधी बाकावर बसावे लागते. गुजरात निवडणुकीच्या इतिहासानुसार, भाजपने 1995 मध्ये 121 जागा, 1998 मध्ये 117 जागा आणि 2002 मध्ये सर्वाधिक 127 जागा जिंकल्या होत्या. यानंतर भाजपने 2007 मध्ये 116 आणि 2012 मध्ये 115 जागा जिंकल्या. मात्र 2017 ची निवडणूक खूपच रंजक होती. दोन दशकाच्या काळात भाजपच्या जागा पहिल्यांदाच दोन अंकावर आली होती. या निवडणुकीत कॉंग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या. याच निवडणुकीत राहुल गांधी यांनी अख्खा गुजरात पिंजून काढला होता.
गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागांमध्ये 27 एसटी, 13 एससी आणि 142 जागा सामान्यांसाठी राखीव आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने एसटीच्या जागांवर मजबूत पकड ठेवली आहे. कॉंग्रेसने 2007 आणि 2012 मध्ये एसटीच्या 59 टक्के आणि 2017 मध्ये 55 टक्के जागा जिंकल्या होत्या. 2017 च्या निवडणुकीत बरीच समीकरणे बदलली. यात कॉंग्रेसने केवळ एससी आणि एसटीच्या जागांवर विजय मिळविला नाही तर सामान्य वर्गाच्या जागाही वाढवल्या. कॉंग्रेसला 2017 मध्ये 57 सर्वसाधारण जागा मिळाल्या, 2012 मध्ये 43 आणि 2007 मध्ये 41 जागा होत्या.त्याच वेळी, 2007 च्या तुलनेत 2017 मध्ये 4 एससी, 2 एसटी आणि 12 सर्वसाधारण गटाच्या विधानसभा जागा भाजपच्या हातातून गेल्या. मात्र, या निवडणुकीत गुजरात निवडणुकीचे चित्र बदलले आहे. आता लढत दोन पक्षांत नसून तीन पक्षांत आहे. आतापर्यंत भाजपचा सामना कॉंग्रेसशी होत होता. भाजपला या निवडणुकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा सामना करावा लागत आहे.
दिल्लीच्या वर्तुळात तर अशी शंका बोलून दाखविली जात आहे की, कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाने दोन्ही राज्यांतील दुसरा क्रमांक आपसात वाटून घेतला आहे. म्हणजे, दोन्ही पक्षांत हातमिळवणी झाली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुजरातची जनता कुणाला सिंहासनावर बसविते याचा निर्णय तर निकालाअंतीच लागेल. परंतु, अरविंद केजरीवाल यांच्या सक्रियतेने भाजप नेत्यांची झोप उडविली आहे, यात दुमत नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी “गुजरातचा मुकाबला हा भाजप आणि कॉंग्रेसमध्ये आहे’ असं म्हणणं बरंच काही सांगून जाते.