जगप्रसिद्ध कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ आणि तत्त्वज्ञ रवींद्रनाथ टागोर यांची आज जयंती. टागोर अलीकडच्या काळातील भारतातील एक ऋषितुल्य, आदरणीय असे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना “गुरुवर्य’ या नावाने संबोधले जाते. त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये गुरूकुल पद्धतीचा अवलंब करून आपला वेगळाच ठसा उमटविला होता.
वर्धमान जिल्ह्यातील कुश हे रवींद्रनाथांचे मूळ गाव. त्यांचा जन्म कोलकाता येथे 7 मे 1861 रोजी पिराली नामक ठाकूर उपनावाच्या कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ व आईचे नाव शारदादेवी होते. रवींद्रनाथांचे बंधू द्विजेंद्रनाथ हे कवी आणि तत्त्वचिंतक होते. सत्येंद्रनाथ हे पहिले भारतीय आयसीएस अधिकारी व व्यासंगी होते. ज्योतिरिंद्रनाथ हे लेखक, नाटककार होते तर भगिनी स्वर्णकुमारी या संगीतरचनाकार, कादंबरी लेखिका व भाषांतरकार होत्या. अशा सुसंस्कृत वातावरणातील घरातच त्यांचा जन्म व संगोपन झाले.
घरातील पहिल्या मजल्यावरच्या आपल्या खिडकीतून बाहेरची निसर्गशोभा पाहत बसणे, हा रवींद्रनाथांचा बालपणीचा विरंगुळा होता.त्यातूनच त्यांची चित्रकला आणि काव्य बहरत गेले. “जॉल पॉडे पाता नॉडे’ (पाणी पडे-पान झुले) ह्या लहानशा (बंगाली भाषा) ओळीतल्या छंदाने व यमकाने त्यांच्या बालमनातील कवी जागृत होऊ लागला. रवींद्रनाथांचे बालवयातच काव्यलेखन सुरू झाले होते. “तत्त्वबोधिनी पत्रिका’ नावाच्या नियतकालिकात त्यांची “अभिलाष’ ही कविता प्रसिद्ध झाली. त्या वेळी ते बारा वर्षांचे होते. मातृभाषेतून त्यांचे शिक्षण त्यांचे बंधू हेमेंद्रनाथ, द्विजेंद्रनाथ आणि ज्योतिरिंद्रनाथ या तीन ज्येष्ठ बंधूंच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले.
1878 साली सत्येंद्रनाथांबरोबर रवींद्रनाथ इंग्लंडला गेले. लंडन युनिव्हर्सिटीमधील हेन्री मॉर्ली यांच्याकडे त्यांनी इंग्रजी साहित्याचा अभ्यास सुरू केला. तेथून “भारती’ या नियतकालिकामध्ये त्यांनी “युरोपयात्री कोनो वंगीय तरुणेर पत्र’ ह्या शीर्षकाखाली युरोपीय जीवन आणि संस्कृतीसंबंधीची पत्रे प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली व लेखन प्रवास सुरू केला. त्यातून इंग्लंडमधील समाजजीवनाबाबत टीकात्मक लेख लिहिल्यामुळे इंग्रजधार्जिण्या उच्चभ्रू बंगाली समाजाचा त्यांच्यावर रोष ओढवला. बहुधा यामुळेच वर्ष 1880 मध्ये त्यांना भारतात परत बोलाविणे आले. त्यामुळे कोणतीही पदवी न घेताच ते परतले. त्यांचा पौगंडावस्थेतील बुजरा स्वभाव, ब्रिटनमधील गतिशीलता, स्वतंत्रता यामुळे बदलला व ते धीट स्पष्टवक्ते युवक झाले होते. भारतात परतल्यावर वर्ष 1881 मध्ये त्यांनी “वाल्मिकी प्रतिभा’ ही पहिली संगीतिका लिहून तिचा कोलकाता येथील जोडासॉंको येथील टागोर वाड्यात पहिला प्रयोग केला. यावेळी त्यांनी पाश्चात्य व भारतीय संगीताचा मिलाफ घडवून जणू “रवींद्रसंगीता’ची सुरुवात केली.
वर्ष 1883 मध्ये भवतारिणी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. नूतन वधूचे नाव मृणालिनी असे ठेवण्यात आले. देवेंद्रनाथांनी तिच्या शिक्षणाची व्यवस्था लॉरेटा हाऊस ह्या विद्यालयात केली. मृणालिनी देवींनी रवींद्रनाथांना त्यांच्या कार्यात मदत करीत संसाराचा गाडा समर्थपणे सांभाळला. वर्ष 1902 मध्ये त्यांच्या पत्नीचे आजारपणात निधन झाले. त्यांच्या वडिलांनी बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील बोलपूरजवळ 20 एकरांचा एक विस्तीर्ण माळ रायपूरच्या जमीनदाराकडून विकत घेऊन तेथे एक कुटिर बांधले होते व त्याला “शांतिनिकेतन’ हे नाव दिले होते. रवींद्रनाथ वर्ष 1873 मध्ये प्रथमच शांतीनिकेतनला आले. वर्ष 1888 मध्ये, त्यांच्या वडिलांनी ब्रह्मविद्यालयाच्या स्थापनेसाठी संपूर्ण मालमत्ता समर्पित केली. वर्ष 1901चे ऑक्टोबर महिन्यात ते सहकुटुंब शांतिनिकेतनात आले आणि तपोवन पद्धतीची शाळा सुरू करण्याच्या कार्याला अधिक नेटाने लागून 22 डिसेंबर 1901 ह्या दिवशी वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी आश्रमशाळेची स्थापना केली. त्याचवेळी रवींद्रनाथांनी येथे ब्रह्मचर्याश्रम सुरू केले आणि वर्ष 1925 पासून ते “पथभवन’ म्हणून ओळखले जाऊ लागले. हेच पुढे “शांतिनिकेतन’ म्हणून प्रसिद्ध झाले.
रवींद्रनाथ यांनी वर्ष 1921 मध्ये कला, वाङ्मय, चित्रकला आणि नाट्यशिक्षणासाठी विश्वभारती या संस्थेची स्थापना केली. येथे गायन, वादन, नृत्य इत्यादी अभिजात कला शिकविल्या जाऊ लागल्या.
रवींद्रनाथांना जागतिक स्तरावर कीर्ती मिळाली ती “गीतांजली’ या काव्यसंग्रहामुळे. मूळ बंगाली भाषेत असलेल्या या काव्यसंग्रहात निसर्ग, प्रेम, भक्तिभाव आणि मानवतावादी मूल्ये या विषयांवर 103 कविता आहेत. मूळ “गीतांजोलि’ हे बंगाली भाषेतील नाव असून, “गीत’ आणि “अंजली’ या शब्दांपासून हा शब्द आला आहे. याचा अर्थ गाण्यांची भेट किंवा अर्पण असा आहे. या कवितासंग्रहाची अनेक भाषांतरे झाली. वर्ष 1913 मध्ये या काव्यसंग्रहास नोबेल पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणारे युरोपबाहेरचे व भारतातील ते पहिले मानकरी ठरले. वर्ष 1915 साली त्यांना ब्रिटिश सरकारने “सर’ ही पदवी दिली. 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली. भारताचे राष्ट्रगीत ही त्यांची मोठी देणगी व आठवण आहे. या गीतातून त्यांनी राष्ट्रीय एकात्मता व भारताची बहुविविधता गुंफली आहे.
त्यांचे सामाजिक व राजकीय कार्यही सुरू होते. ते पुणे येथे आले असता त्यांनी पंडिता रमाबाईंचे व्याख्यान ऐकले. सनातनी लोकांनी आरडाओरडा करून ते व्याख्यान बंद पाडलेले पाहून ते अत्यंत व्यथित झाले. त्यानंतर त्यांनी स्त्री स्वातंत्र्यासंबंधीच्या तसेच स्त्रियांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या विचारांना चालना देणारा लेख लिहिला. बंकिमचंद्र चटर्जींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी “इंग्रज ओ भारतवासी’ ह्या आपल्या लिखित भाषणातून राष्ट्रीय विकासाचा मूलभूत पाया ग्रामीण विकास हा आहे, हा विचार मांडला. मातृभाषेतून शिक्षण, स्वावलंबन आणि स्वाभिमान हा स्वदेशी चळवळीचा कणा आहे, हे त्यांचे मतही त्यांनी प्रभावीपणे मांडले. वर्ष 1890 ते 1900 हा दहा वर्षांचा कालावधी त्यांनी ग्रामीण भागातच व्यतीत केला. गुरुवर्यांची प्राणज्योत 7 ऑगस्ट 1941 रोजी मालवली.
– माधव विद्वांस