नवी दिल्ली – भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वच विरोधी पक्ष तयार असून ही वज्रमूठ कायम असेल,असा विश्वास नितीश कुमार यांनी बैठकीनंतर बोलताना व्यक्त केला. पाटण्यात शुक्रवारी विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली.मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अडीच तास चाललेल्या बैठकीत 15 पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करून नितीश कुमार यांना यूपीएचे संयोजक बनवण्याबाबत चर्चा झाली.
नितीश कुमार म्हणाले, विरोधी पक्षांची दुसरी बैठक शिमलामध्ये होणार आहे. ही बैठक 10 ते 12 जुलैला आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोण, कुठे लढणार याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, नितीश कुमार यांनी चांगल्या प्रकारे बैठकीचे आयोजन केले आहे. पाटणामधूनच आंदोलन सुरू होते. दिल्लीमध्ये अनेकदा बैठक झाली. पण त्याचा काहीही निष्कर्ष निघाला नाही. आजच्या बैठकीत तीन गोष्टी स्पष्ट झाल्या. पहिली म्हणजे आपण एक आहोत. दुसरी आपण एकत्र लढू आणि तिसरी म्हणजे भाजप जो पॉलिटिकल अजेंडा आणेल त्याला विरोध करू.आज इतिहासातील मोठा दिवस आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी कलम 370 हटवण्याच्या आम आदमी पार्टीच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. सर्व पक्षांनी केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांना पाठिंबा द्यावा असे कॉंग्रेसला सांगितले आहे.