मुंबई : अमरावतीच्या राणा दाम्पत्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली झालेल्या अटकेनंतर आज त्यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांचा जामीन सशर्तपणे न्यायालयाने मंजूर केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने दिलेला हा निर्णय राणा दाम्पत्याला मोठा दिलासा मानला जात आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. तब्बल 12 दिवसांनी राणा दाम्पत्याची कोठडीतून सुटका झाली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात 6 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या जामिनाला विरोध केला होता. आज पुन्हा राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयानं त्यांना दिलासा दिला आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.
तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे या दाम्पत्याने जाहीर केले होते. त्यानंतर पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करून न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध करण्यात येत होता. मात्र आज अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.