आर्थिक चक्रे गतीमान होण्याची आशा
पिंपरी – करोनामुळे त्रासलेल्या जगाला आता नव्या वर्षाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कामगार व उद्योजकांचे झालेले नुकसान पाहता नवेवर्ष आरोग्यदायी, आर्थिक समाधानाचे असावे, अशी सर्वजणच अपेक्षा व्यक्त करु लागले आहेत. अर्थकारणाला गती देण्यासाठी आरोग्यदायी वातावरण असणेदेखील आवश्यक आहे.
करोनाचा फटका संपूर्ण जगालाच बसला आहे. आर्थिक चक्र असलेले उद्योगधंदे लॉकडाऊनकाळात जवळपास सहा महिने बंद राहिले. त्यामुळे कामगारांना घरीच बसावे लागले. परिणामी शहरातील हजारो कामगारांना रोजगाराला मुकावे लागले. तर अनेकांना तुटपुंज्या पगारावर आपली नोकरी कशीबशी टिकविण्यावर समाधान मानावे लागले. त्यामुळे सरते वर्ष कामगार विश्वाकरिता क्लेशदायक ठरले.
राज्यातील महत्वाच्या औद्योगिक वसाहतींमध्ये पिंपरी-चिंचवड एमआयडीसीचा समावेश होतो. याबळावरच या शहराची औद्योगिकनगरी, कामगारनगरी अशी ओळख आहे. मात्र करोनाचा फटका या शहरालादेखील बसला. मार्च महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कामगारांना घरीच बसावे लागले. तर या संकटापासून बाहेर पडू न शकणाऱ्या अनेक लहान उद्योगांना औद्योगिकनगरीच्या नकाशावरुन आपले अस्तित्व गमवावे लागले. अनेक कामगारांना करोनाने आपल्या विळख्यात घेतले.
दरम्यान, केवळ औद्योगिकच नव्हे, तर हॉटेल कामगार, बांधकाम मजूर, धुणीभांड्याची कामे करणाऱ्या महिला, रोजंदारीवर काम करणारे श्रमिक अशा हजारो कामागारांच्या हातचे काम करोनाने हिरावले. यामुळे शहराच्या अर्थकारणालाच खीळ बसली. सद्यस्थितीत उद्योगनगरीतील उद्योग सुुरु असले, तरीदेखील वेतनवाढ कराराबाबत कामगार संघटना आक्रमक होऊ शकतील, अशी परिस्थिती नाही. तर रोजगार आबाधित राहण्यावर कामगारांना समाधान मानावे लागले आहे.
उद्योगनगरीतील उद्योगांच्या चाकांनी सप्टेंबर महिन्यापासून गती धरली आहे. परिस्थिती पुर्वपदावर आली असल्याचे दिलासादायक चित्र आहे. करोनाच्या थैमानामुळे 2020 वर्ष आपत्तीजनक असल्याची सर्वांचीच भावना झाली आहे. मात्र, हे वर्ष सरत असून, येणाऱ्या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या अपेक्षेने कामगार विश्व सामोरे जात आहे.