बारामती, (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडील मासिक वीजबिलांची १०० टक्के वसूली होत नसल्याने थकबाकीमध्ये वाढ झाली असून, महावितरणची आर्थिक स्थिती चिंताजनक होत आहे. त्यामुळे मागील थकबाकीसह चालू वीजबिलांची १०० टक्के वसूली करावीच लागणार आहे.
जे ग्राहक थकबाकीदार आहेत. त्यांचा नियमानुसार तत्काळ वीजपुरवठा खंडित करावा; अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिला.
बारामती मंडलांतर्गत केडगाव व बारामती येथे सर्व शाखा कार्यालयांची वीजबिल वसुली, थकबाकी, वीजहानी व नवीन वीजजोडण्यांबाबत प्रादेशिक संचालक नाळे यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता म्हसू मिसाळ, संजय सोनवलकर यांच्यासह सर्व अभियंते व अधिकारी यांची उपस्थिती होती. नाळे म्हणाले, प्रत्येक महिन्यात वीजबिलांच्या थकबाकीची रक्कम वाढत असताना मात्र थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची गती अतिशय संथ आहे.
हा प्रकार मुळीच खपवून घेतला जाणार नाही. ‘ना नफा, ना तोटा’ (रेव्हेन्यू न्यूट्रल) तत्वाने वीजसेवा देणाऱ्या महावितरणची आर्थिक स्थिती ही सर्वस्वी वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच अवलंबून आहे. त्यातूनच वीजखरेदी, नियमित व बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन, कार्यालयीन खर्च, विविध कर, दैनंदिन देखभाल व दुरुस्तीचे कामे आणि व्याजासह कर्जांचे हप्ते अशा दरमहा देणी द्यावी लागतात. ही सर्व आर्थिक भिस्त केवळ वीजबिलांच्या वसूलीवर अवलंबून असल्याने थकबाकीमध्ये होणारी वाढ खपवून घेणार नाही.
पाणीपुरवठा योजनावर १०० कोटींची उड्डाणे
बारामती मंडलात सध्या १ लाख १४ हजार ४२७ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे १४ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर दिवाबत्तीच्या ३५५६ वीजजोडण्या थकीत आहेत. यांच्याकडे १६९ कोटी व पाणीपुरवठा योजनेच्या ११७४ थकीत जोडण्यांवर १०० कोटींची थकबाकी आहे.
थकबाकीसह चालू महिन्यांचे वीजबिल १०० टक्के वसुलीचे ध्येय ठेऊनच काम करावे लागणार आहे. त्यामुळे वारंवार आवाहन करूनही वीज बिल भरण्यास प्रतिसाद देत नाही, अशा थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना नाळे यांनी दिल्या.
आवश्यक तिथे पोलीस संरक्षण घ्या
नाळे म्हणाले की, मंडलअंतर्गत कार्यालयांतील मनुष्यबळाचे नियोजन करावे तसेच आवश्यक तेथे पोलीस संरक्षण घ्यावे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर संबंधित थकबाकीदार ग्राहकांची नोंद मोबाईल ॲपद्वारे महावितरणच्या संगणकीय प्रणालीत ताबडतोब करावी, ग्राहकांनी नियमानुसार रिकनेक्शन चार्जेस भरल्याशिवाय वीजपुरवठा सूरू करू नये अशी सक्त सूचना नाळे यांनी यावेळी केली.