डिंभे धरणातून उलव्या कालव्याला पाणी सोडले
लाखणगाव – उजव्या कालव्याला हुतात्मा बाबू गेनु सागर डिंभे धरणातून पाणी सोडल्याने आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 50 गावांना या पाण्याचा फायदा होणार असून सध्या पाण्याअभावी जळू लागलेल्या पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे.
आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 50 गावांना डिंभे उजव्या कालव्याद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या पाण्याच्या भरोशावर येथील शेती पिके उभी आहेत; परंतु जून महिना संपत आला तरीही पावसाअभावी येथील शेती पिके जळू लागली होती. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी उजव्या कालव्याला पाणी सोडावी, अशी मागणी केली होती.
या मागणीला यश येऊन डिंभे धरणाचे उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. या पाण्याचा उपयोग आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागांसह शिरूर तालुक्यातील ही अनेकांना होत असतो. सध्या कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने कालव्याच्या पाण्याचा उपयोग शेती पिकांना होत आहे. त्यामुळे सध्या जळू लागलेली शेती पिकांना या पाण्याचा फायदा होणार असूनही पिके जगणार आहेत.
धरणातील पाणीसाठा कमी असल्यामुळे हे आवर्तन जास्त दिवस चालणार नाही. त्यामुळे जे पाणी या कालव्याला येईल त्या पाण्याचा योग्य उपयोग शेतकऱ्यांनी करावा तसेच पाणीपट्टी भरण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, अभियंता दत्ता कोकणे यांनी केले. पाऊस येईपर्यंत शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करणे ही गरजेचे बनले आहे. पाणी सोडल्याने या कालव्याखालील गावातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नदीला पाणी सोडा
जलसंपदा विभागाच्या वतीने कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढल्यामुळे बंधाऱ्यात असणारे पाणी वाहून गेले आहे तर शिल्लक असलेले पाणी झपाट्याने कमी होवू लागले असून शेतकरी वर्ग मोटारी खाली घेऊन पाइप जोडून पाणी उपसा करत आहेत. त्यामुळे नदीला पाणी सोडावे, अशी मागणी शरद बॅंकेचे संचालक नितीन वाव्हळ आणि पारगावचे सरपंच बबनराव ढोबळे यांनी केली आहे.