बेबी कालवा कोरडाठाक; गावे तहानलेली
बहुतांश बोअरवेल पडल्या बंद
अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय
नांदूर – दौंड तालुक्यातील पश्चिम पट्टयातील ताम्हाणवाडी, डाळींब, बोरीऐंदी, बोरीभडक या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. कामधंदा सोडून पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट सुरु आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्टयातील गावांमध्ये भीषण पाणीटंचाई सुरू आहे. टॅंकरद्वारे पाणी सुरू करावे, अशी मागणी होत आहे. सध्या बेबी कालवा कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी रानावणात वणवण भटकंती करावी लागत आहे.
दौंड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात तीव्र उन्हाळा आणि लांबलेला पाऊस आदी कारणांमुळे बहुतांश बोअरचे पाणी कमी झाले आहे. काहींचे पूर्ण बंद झाले आहेत. पाणी येत नसल्याने व कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने जीव धोक्यात घालून शेतातील विजेच्या वेळानुसार रात्री दिवसा येणाऱ्या पाण्याची वाट पहावी लागत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी रात्री- अपरात्री जावे लागत आहे.
तब्बल दोन महिन्यांपासून नागरिकांची कसरत सुरू आहे. मात्र, लोकसंख्या अधिक असल्याने व अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांची गैरसोय सुरू आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. कामाला सुरुवात लवकर करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने याची दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
डाळींब गावाला फक्त 15 मिनिटे पिण्याचे पाणी येते. आम्ही दौंड गट विकास अधिकारी यांना लेखी पत्र दिले आहे. आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज आहे. लवकर टॅंकर सुरू करावा. – बजरंग म्हस्के, सरपंच, डाळींब
ताम्हाणवाडी गावामध्ये पाण्याच्या पाण्याची बिकट अवस्था झाली आहे. अनेक दिवसापासून गावाला पाणी कमी झाले आहे. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा लवकर सुरू करावा. प्रशासनाने याची दखल घ्यावी.
– संदीप ताम्हाणे, माजी सरपंच, ताम्हाणवाडी
सध्या गावातीला पाण्याची पातळी कमी झाली आहे. प्रशासनाने भविष्यात गावाला पाणी कमी पडू नये म्हणुन पर्याय करावा.
– सविता भोसेकर, सरपंच, बोरीऐंदी
गावची पाणीपुरवठा विहिर, कालव्याच्या कडेला आहे. आता सध्या कालवा पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे गावाला पाणीटंचाई भासत आहे. गावामधील चंदनवाडी, खेडेकर वस्ती, आतकिरे वस्ती, म्हेत्रे वस्ती याठिकाणी ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्यासाठी पाइपलाइन नाही. त्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा लवकर सुरू करावा. – अमोल म्हेत्रे, सदस्य, बोरीभडक ग्रामपंचायत
सध्या फक्त डाळींब ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची मागणी केली आहे. इतर कोणत्याही गावाने मागणी केली नाही.
– अजिंक्य येळे, गटविकास अधिकारी, दौंड