मुंबई – महाराष्ट्र विधी मंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असुन आज (दि. १८) दुसऱ्या दिवशी पुणे कसबा पेठ विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावां सहित शहराच्या पाणी पुरवठ्या बाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
पुणे महापालिकत समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये झालेला पाण्याचा प्रश्न, पूणे शहरातील बहुचर्चित समान पाणी पुरवठा योजनेचे काम अर्धवट आहे. याबाबत शासनाने पाणी प्रश्न लवकर सोडविणे, स्वच्छ पाणी पुरवठा करणे,
समान पाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण करणे, टँकर माफियावर नियंत्रण आणणे, शहरातील मध्य पेठांच्या भागातील पाण्याचा प्रश्न, तसेच अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या आजारावर नियंत्रण आणण्यासंदर्भात धंगेकर यांनी सभागृहात प्रश्न मांडला होता.
या प्रसंगी धंगेकर यांनी “पुणे शहरातील मध्य पेठ्यांचा भाग व वाढलेली लोकसंख्या पाहता शासन २१ टीएमसी पाणी देणार का? हा प्रश्न केला. यावेळी प्रश्नाला उत्तर देताना डी. पी. आर करण्याचे कार्यवाही मनपामार्फत सुरु असून लवकरच याबाबत निर्णय होईल असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.