नवी दिल्ली – सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत आता टोमॅटोवर चोरट्यांचा डोळा आहे. नवीन सब्जी मंडईत काल रात्री चोरट्यांनी एका दुकानातून टोमॅटोने भरलेले कॅरेट, बटाट्याचं पोत व इतर साहित्य चोरून नेले. उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात हा प्रकार घडला.
टोमॅटो, बटाटे चोरीला गेल्याने मंडई परिसरात खळबळ उडाली आहे. दुसरीकडे टोमॅटो आणि बटाटा चोरीच्या घटनेबाबत पोलिसांचे म्हणणे आहे की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून चोरट्यावर कारवाई केली जाईल.या चोरीमध्ये एकूण 12 हजार किमतीचा भाजीपाला चोरीला गेल्याचे समजते.
हरदोई जिल्ह्यातील पोलीस स्टेशन कोतवाली सिटी परिसरातील लखनौ रोडवर असलेल्या नवीन सब्जी मंडी कॉम्प्लेक्समध्ये ही चोरी झाल्याचे समोर आले. येथे भाजीपाल्याचा घाऊक व्यापार चालतो. शहर परिसरातील भाजी मंडई व्यतिरिक्त जिल्ह्यातील इतर बाजारपेठेतील व्यापारीही येथून भाजी खरेदी करतात. काल रात्री चोरट्यांनी राजाराम यांच्या दुकानातून टोमॅटोचे सुमारे २५ किलोचे कॅरेट, बटाट्याची पोती, इलेक्ट्रॉनिक काटा व इतर साहित्य चोरून नेले.
चोरट्यांनी सुमारे १२ हजार किमतीचा भाजीपाला व इतर माल चोरून नेल्याचे राजाराम यांनी सांगितले. आजकाल टोमॅटोचे भाव सातत्याने वाढत आहेत. टोमॅटोची घाऊक 120 ते 130 रुपयांनी विक्री होत असताना किरकोळ विक्री मात्र 150 रुपये किलोवर जात आहे. हा बाजार सकाळी 10 वाजेपर्यंत सुरू असतो आणि नंतर बंद होतो.अशात चोरीची ही घटना घडल्याने इतर सर्व व्यापारी सतर्क झाले आहेत. मंडईमध्ये वस्तूंची चोरी होणे हा प्रकार मार्केटला नवीन नाही मात्र आता वस्तूंसोबत भाजीपाल्याची देखील चोरी होऊ लागल्याने कलियुग आले.. असेच म्हणण्याची वेळ येथील व्यापाऱ्यांवर आली आहे.