नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणुका लवकर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नुकतेच त्यांनी लोकसभा निवडणुका कधीही होऊ शकतात, म्हणून राज्यातील सर्व प्रलंबित योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुका लवकर होण्याची भीती व्यक्त करणारे नितीशकुमार हे पहिले व्यक्ती नाहीत. अनेक प्रसिद्ध राजकीय विश्लेषकही काही संकेतांच्या आधारे केंद्र सरकार वेळेपूर्वी निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ शकते, अशी भीती व्यक्त करत आहेत.
कर्नाटक निवडणुकीच्या निकालाच्या आधारे मोदींची लोकप्रियता कमी होत असल्याचा दावा केला जात आहे. त्यांना एकहाती निवडणूक जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत भाजपला वेळेआधी निवडणुका घेऊन विजय निश्चित करायचा आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जी-20 बैठकीसाठी जगातील प्रमुख नेते देशात असतील. त्यावेळी देशाची प्रतिम उजळवण्याचा प्रयत्न होईल. अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन जानेवारी 2024 मध्ये प्रस्तावित आहे. वेळेआधी त्याचे उद्घाटन करून फायदा घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
लोकसभा निवडणुका वेळापत्रकानुसारच होतील. सरकार मुदतपूर्व निवडणुका जाहीर करेल, अशी शक्यता नाही. सरकार देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम घेत आहे, भारत जगातील एक अव्वल आर्थिक महासत्ता बनत आहे. अशा परिस्थितीत मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता नाही.
– प्रेम शुक्ला, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते
अशी असू शकतात कारणे…
* सप्टेंबर-ऑक्टोबरमधील जी-20 बैठकीचे भांडवल
* जानेवारीत अयोध्येत राममूर्तींची प्रतिष्ठापना
* सर्व मंत्रालयांकडून सध्या नऊ वर्षांचे मूल्यमापन
* विरोधकांना बेसावध गाठण्याची रणनीती
* विरोधी एकजुटीमधील उशीर भाजपच्या पथ्यावर
* दोन हजारची नोटबंदी पूर्ततेच्या मार्गावर
* विधानसभांचा निकाल विरोधात गेल्यास आपत्ती