नवी दिल्ली – आम्ही भारतीय जनता पक्षासोबत यावे यासाठी ते आमच्यावर दबाव आणत आहेत. परंतु आम्ही काहीही गैर केले नसल्याने आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे आम्हाला त्यांच्या दबावापुढे झुकण्याचे कारण नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. केजरीवाल यांच्या विधानावर माजी क्रिकेटर आणि भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीतील किरारी येथे केजरीवाल यांनी दोन शाळांची पायाभरणी केली. त्या कार्यक्रमाला संबोधित करताना केजरीवाल यांनी दावा केला की भाजपला आम्ही त्यांच्या पक्षात सामील व्हावे अशी त्यांची इच्छा होती. परंतु आम्ही भाजपबरोबर जाण्यास ठाम नकार दिला. त्यामुळे ते आमच्या विरोधात कोणतेही षडयंत्र रचू शकतात. पण त्याने काहीही होणार नाही. मी त्यांच्या विरोधात खंबीरपणे उभा आहे आणि मी झुकणार नाही.
अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर भाजप खासदार गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग किंवा गुन्हे अन्वेशन विभागासारख्या ज्या शासकीय संस्था आहेत, त्यांना त्यांचं काम करू द्या. असं गंभीर यावेळी म्हणाला.तसेच जो खरा असतो तो निधड्या छातीने लढतो, तो पळून जात नाही आणि यालाच इमानदारी म्हटलं जातं. जो निधड्या छातीने लढतो तोच खरा योद्धा असतो. याउपर मी काहीच बोलू शकत नाही असं देखील गंभीर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
नेमकं काय म्हणाले केजरीवाल
केजरीवाल म्हणाले की आम्ही दिल्लीतील शिक्षण आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी कार्यरत आहोत. मला जरी अटक झाली तरी या कामात खंड पडणार नाही. भाजपने आम आदमी पक्षाच्या नेत्यांवर जे खटले दाखल केले आहेत ते सर्व खोटे आहेत असे त्यांनी ठासून सांगितले. ज्यांनी गैरव्यवहार केले ते भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्यावरील खटले मागे घेतले गेले. आम्हीही त्यांच्याबरोबर जावे असे त्यांचे म्हणणे आहे. मग आमच्या विरोधातील केसेस बंद होतील पण आम्ही काहीच चुकीचे केले नाही त्यामुळे आम्ही भाजपबरोबर का जाऊ असा सवालही त्यांनी यावेळी केला. दिल्लीत विकासकामे थांबणार नाहीत, आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत देशाची आणि समाजाची सेवा करत राहू, असेही ते म्हणाले.