Prakash Ambedkar – सांगली येथे नुकतीच झालेली वंचित बहुजन आघाडीची सभा चांगलीच चर्चेत आहे. या सभेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या भाषणामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. या सभेतील मंचावर महाराष्ट्रातील सर्वच महापुरुषांची प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले यांच्यासह टिपू सुलतान यांचीही प्रतिमा ठेवण्यात आली.
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांना सांगलीतील पोलिसांनी या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करताना टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला हार घालू नये, असे सांगितले यानंतर आंबेडकरांनी वंचितच्या ‘सत्ता संपादन सभेत’ पोलिसांना इशारा दिला.
सांगलीतील ‘सत्ता संपादन सभा’ सुरू होण्यापूर्वी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मंचावरील महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू नये, असे सांगितले. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांच्या सूचना फेटाळत टिपू सुलतान यांच्याही प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच भरसभेत प्रकाश आंबेडकर यांनी पोलिसांना इशारा दिला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘आम्ही आज टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घातला. मात्र, काहींनी घालू नका असे सांगितले. तुम्ही टिपू सुलतानच्या प्रतिमेला हार घातला तर बघा, असा इशारा देण्यात आला होता. पोलीस खात्याला माझं आवाहन आहे की, पाच वर्षांनंतर निवडणुका येतात आणि सरकार बदलतं.” असा सूचक इशारा दिला.