नगर – नरेंद्र मोदींची धोरणे देश बुडवणारी असून, या धोरणामुळे देश कणाहीन होत चालला आहे. मोदी सत्तेवर येण्याआधी देशावर १०० रुपयापैकी २६ रुपयांचे कर्ज होते. ते सत्तेवर आल्यानंतरच्या १० वर्षात हे कर्ज आता ८४ रुपयांचे झाले आहे. व आता पुन्हा सत्तेवर आल्यास ते ९६ रुपयांवर जाईल. यामुळे मतदारांनी आता देशातील घराणेशाही आधी संपवण्याची गरज असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
नगरमध्ये आयोजित सभेत सुरवातीलाच बोलतांना आंबेडकर म्हणाले, भारतीय जनता पक्षाची माणसे ही काँग्रेसला भेटत आहेत. ही काँग्रेसला चांगली परिस्थिती आहे. सध्या महाराष्ट्रातील काँग्रेस ही नेते बाळासाहेब थोरात यांच्या हातात असल्याने थोरात यांना ही चांगली स्थिती आहे. परंतु मंत्री राधाकृष्ण विखे आता काँग्रेसच्या संपर्कात आल्याने कधी काय होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना ही वॉर्निंग घंटा आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
करोना काळामध्ये लोकांच्या आरोग्याशी खेळणार्या मोदी यांना काँग्रेसने मौत का सौदागर म्हटले होते. काँग्रेसचे ते म्हणणे योग्यच होते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने करोना काळामध्ये रेमडीसीवर हे देऊ नये, असे सांगितलेले असतांना अन्य देशांनी त्यावर बंदी घातली असतांना आपल्या देशात मोदी यांनी संबंधीत कंपनीला मुभा दिली. कारण त्यांचा मालक गुजराती होता. तसेच त्यांनी भाजपसाठी इलेक्टोरड बॉण्ड खरेदी केले आणि त्यानंतर त्यांना रेमडीसीवर विकायची परवानगी दिली गेली, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
जो माणूस पक्षाची तिजोरी भरतो व लोकांच्या जीवनाशी खेळतो त्याला आता आपण सत्तेवर बसवायचे का, असा सवाल आंबेडकर यांनी यावेळी केला. मोदी यांनी देशाला बनाना रिपब्लिक करून ठेवला आहे. त्यामुळे आपला देश आता कशाच्या उंबरठ्यावर आहे हे सांगण्याची गरज राहिली, नाही. म्हणून आगामी काळामध्ये आता आपल्याला ओबीसी समुदायाचे राजकारण पुढे आणायचे आहे. त्यासाठी ही निवडणूक आहे. पाणी कालांतराने गढूळ होते व त्यानंतर आपण ते पाणी फेकून देतो तशाच पद्धतीने आता हे राजकीय पाणी गढून झाले आहे, आता ते फेकून द्या, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
हाच खेळ त्यांचा वर्षानुवर्षे चालू
काँग्रेसने मुस्लिम, धनगर, माळी, लिंगायत वा अन्य कितीजणांना उमेदवारी दिली, असा सवाल करून आंबेडकर म्हणाले, त्यांनी सर्व घराणेशाही व श्रीमंत मराठ्यांना उमेदवारी दिली आहे. हाच खेळ त्यांचा वर्षानुवर्षे चालू आहे व त्यामुळे देशाचा विकास होत नाही. भाजप, काँग्रेस, शिंदे सेना, ठाकरे सेना, दोन्ही राष्ट्रवादी या सर्वांचे उमेदवार घराणेशाहीचे असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.
आताचे त्यांचे उमेदवार हे नात्यागोत्यातील
सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठ्यांना उमेदवारी दिली. मात्र, हे मराठा हे श्रीमंत आणि घराणेशाहीतील आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणार्या मनोज जरांगे यांच्या सोबत असणार्या मराठ्यांना त्यांनी का उमेदवारी दिली नाही. आताचे त्यांचे उमेदवार हे नात्यागोत्यातील आहे. एकाच शरिरातील उजवा सत्ताधार्यांकडून तर डाव्याला विरोधकांनी उमेदवारी दिलेली आहे. यामुळे कोणीही निवडून आले तरी शरिराचे नुकसान होणार नाही. आतापर्यंत हाच खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.