Maratha Reservation: राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा दिला आहे. यावरून सध्या भुजबळ विरुद्ध जरांगे हा वाद सुरू असल्याचे दिसत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी गठीत केलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती तत्काळ रद्द करा आणि मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. हिंगोली येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेत बोलताना त्यांनी ही मागणी मांडली होती. या मागणीला विरोध करत आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी भूजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी भूजबळ यांच्यावर निशाणा साधत संपूर्ण मराठा समाजात कुणीबीचा लाभ मिळणाऱ्यांची आकडेवारी सांगितली आहे.
काय म्हणाले बच्चू कडू ?
“ज्या मराठा कुटुंबांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना जातीचा दाखला देण्यापासून या देशातली कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. छगन भुजबळांचा बोभाटा सुरू आहे की पाच कोटी मराठे ओबीसीत सामील होणार आहेत. मग हा विदर्भातला बच्चू कडू जो ५० वर्षांपासून ओबीसीत आहे त्याचं काय? माझे माय-बाप आणि आधीच्या पिढ्यांपासून आम्ही सगळेच ओबीसीत आहोत. आम्ही मराठेच होतो, कुणबी प्रमाणपत्रामुळे ओबीसी झालो,”बच्चू कडू म्हणाले.
विदर्भातला मराठा ओबीसीत सामील झाला, कुणबी नोंदी असलेला खानदेशातला, पश्चिम महाराष्ट्रातला आणि कोकणातला मराठाही ओबीसीत सामील झाला आहे. केवळ मराठवाड्याचा प्रश्न होता. जो सोडवण्यात आला आहे. आता नोंदी असलेल्या सगळ्यांनाच प्रमाणपत्र मिळेल. मराठा हा कुणबीच आहे. तो कुणबी नाही तर मग दुसरा काय आहे ते कोणत्याही माय का लालने येऊन आम्हाला सांगावे, असा इशाराही आमदार कडू यांनी दिली.
“एकूण ९ जिल्हे आहेत, तेथील कुटुबांची संख्या ४ लाख एवढी आहे. आपण ८ जिल्हे पकडले तर ८ जिल्ह्यातील एकूण संख्या ३२ लाख होईल. त्या ३२ लाखातील अर्धे बाद झाले, मग राहिले अर्धे १६ लाख १६ लाखचे ४ गुणा केल्यास ६४ लाख होतात. आता, ३६ लाख लोकांना प्रमाणपत्र भेटले, राहिला विषय ३६ लाखांचा, त्याला तुम्ही विरोध करत आहात. पण, इकडे मराठा कायदेशीर मार्गाने कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे, ते कोणीही रोखू शकत नाही”, असे स्पष्ट बच्चू कडू यांनी सांगितले.