भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आहे. परंपरा, श्रद्धा, रीतीरिवाज यांचे पालन करत भारतीय समाजात सण-उत्सव साजरे केले जातात. या उत्सवकाळातील चैतन्यामुळे ते आनंदोत्सव बनतात. प्रत्येक उत्सवांचे श्रेयस आणि प्रेयस असे दोन भाग असतात. यातील श्रेयस भाग हा तत्त्वांशी निगडित असतो. या सणांमागील भूमिका, परंपरा, त्याच्या उभारणीमागची कारणे यांच्याशी निगडित आहे. प्रेयस भाग हा उत्सवांमधील उल्हास, आनंद, मिरवणूक, लोकांचं नाचणं-बागडणं याच्याशी निगडित आहे.
उत्सव साजरे करताना श्रेयस आणि प्रेयस यांच्यात समन्वय झाला तर उत्सव अतिशय सुंदर प्रकारे साजरा होतो. प्रत्येक सणामागे-उत्सवामागे एक तत्त्व आहे. सण, उत्सव जर नसतील तर आपलं जीवन शुष्क होऊन जाईल, यंत्रवत बनून जाईल. आपल्याला काहीतरी चैतन्य, ऊर्जा, प्रेरणा आवश्यक असते. सामूहिक जीवनामध्ये ही प्रेरणा असणे अधिक आवश्यक असतं. त्यासाठी आपण उत्सवांची, सणांची सुरुवात केलेली आहे. गणेशोत्सव हे याचं मूर्तिमंत उदाहरण.
“मंगलमूर्ती मोरया, गणपतीबाप्पा मोरया’च्या गजरात भाद्रपदातील चतुर्थीला गणरायाचे आगमन घरोघरी होते आणि वातावरणात अनामिक मांगल्य भारून जाते. आजवरच्या इतिहासात उत्सवांच्या साजरीकरणात भलेही बदल होत गेला असेल; पण उत्सवातील उत्साह द्विगुणितच होत गेलेला दिसतो. गणेश ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची देवता मानली जाते. कोणत्याही मंगलकार्याचा आरंभ गणेश पूजनाशिवाय होत नाही, यातच या देवतेचे श्रेष्ठत्व सामावलेले आहे. भारतीय संस्कृती ही ज्ञाननिष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ आहे. हे दोन्हीही गुण श्रीगणेशात असल्यामुळे गणेशाला भारतानेच नव्हे तर परदेशातही स्वीकारले गेले आहे.
गणपती ही नुसती ज्ञानाची देवता नाही. गणपती म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही, वस्तूचे ज्ञान नाही. गणपती म्हणजे ज्ञानातून विज्ञान आणि विज्ञानातून आत्मज्ञान असा प्रवास आहे. आत्मिकता आणि अध्यात्मिकतेचा तो उत्कृष्ट संगम आहे. 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. यंदाचं वर्ष हे लोकमान्यांच्या पुण्यतिथीचं जन्मशताब्दी वर्ष आहे. पण यंदाच्या गणेशोत्सवाला करोना वैश्विक महामारीची पार्श्वभूमी आहे. तसे पाहिले तर भारतभूमीने आजवर अनेक संकटे पचवली आहेत आणि त्यावर मात करून आपल्यातील धिरोदात्तपणाचे दर्शन जगाला घडवले आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, भूकंप, दहशतवादी हल्ले अशा अगणित नैसर्गिक-मानवी संकटांच्या काळातही भारतीय समाजाने आपली उत्सवप्रियता, अध्यात्मिक भाव जोपासला आहे.
गणपती हा तर विघ्नहर्ता. विघ्नांचे हरण करणारी देवता. यंदा या विघ्नहर्त्याकडे सर्वच जण करोनाचे विघ्न हरू दे अशी प्रार्थना करतील. पण आपल्याकडील अध्यात्मिकतेला सुजाणतेची, सूज्ञपणाची जोड राहिली आहे. यंदा करोनाच्या संकटकाळात या सुजाणतेपणाची नितांत गरज निर्माण झाली आहे. गेले काही महिने या विषाणू संक्रमणामुळे उडालेली दैना आपण पाहात आहोत. लॉकडाऊन ते न्यू नॉर्मल असे “संक्रमण’ करत हळूहळू जनजीवन आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असले तरी विषाणूसंसर्ग आणि मृत्यूचे सत्र थांबलेले नाहीत. याची जाणीव गणेशोत्सव काळात असणे गरजेचे आहे. याखेरीज गेल्या काही वर्षांपासून रूढ होत असलेला इको फ्रेंडली गणेशोत्सवाचा प्रवाहही यंदा अधिक व्यापक होणे गरजेचे आहे. यासाठी गणेशाची मूर्ती मातीची, शाडूची किंवा कागदी लगद्यापासून बनवलेलीच असावी, हा दंडक प्रत्येकानेच पाळायला हवा. केवळ पर्यावरणाची हानी टाळण्यासाठीच नव्हे तर सध्याच्या काळात विसर्जनाच्या दृष्टीनेही ते अधिक महत्त्वाचे आहे.
राज्यातील सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमींबरोबरच पंचांगकर्त्यांनीही जनतेला याबाबत आवाहन केले आहे. भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला केल्या जाणाऱ्या व्रताला पार्थिव सिद्धीविनायक व्रत असे म्हणतात. या व्रतामध्ये पूजेसाठी, उपासनेसाठी पार्थिव म्हणजे मातीची मूर्ती असावी, असे शास्त्रकारांनी सांगितले आहे. यासाठी शेतामध्ये जाऊन माती आणावी, भिजवावी आणि सिद्धीविनायकाची मूर्ती तयार करावी, असे म्हटले आहे. त्यामुळे शाडूची मूर्ती आणणे हेच खऱ्या अर्थाने शास्त्राचे पालन करणे आहे. करोनाच्या संकटावर मात करण्याच्या त्रिसूत्रीमध्ये मास्क, सॅनिटायझरसोबत शारीरिक अंतराचा समावेश आहे.
आपल्याकडे दरवर्षी गणपती विसर्जनासाठी होणाऱ्या गर्दीमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे शक्य होणारे नाही. शाडूची मूर्ती आणल्यास घरच्या घरी तिचे विसर्जन करता येणे शक्य होईल आणि अर्थातच हे विसर्जन भयमुक्त ठरेल. याखेरीज सरकारी यंत्रणांकडून दिल्या गेलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करायला हवे. एरवी “हेही दिवस जातील’ असे म्हणत आपण अडचणींचा काळ मागे सारून पुढे जात असतो. हीच भूमिका आज गरजेची आहे. राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या काही वर्षांमध्ये समाजहितैषी उपक्रम राबवत गणेशोत्सवाला विधायक स्वरूप दिले आहे. यंदाही बहुतांश गणेशोत्सव मंडळांकडून दरवर्षीची परंपरा जपली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 133 गावांनी तर यंदा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. वसईतील 775 पैकी 151 सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव रद्द केले आहेत, तर बहुतांश सार्वजनिक मंडळांनी दहा दिवसांऐवजी दीड दिवसांचे गणपती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य बहुतेक मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. एक गाव, एक गणपती बसवणाऱ्या ग्रामपंचायतींनी या उत्सवावरील खर्च करोना महामारीचा निपटारा करण्यासाठी आपापल्या गावात सामाजिक उपक्रमासाठी करणार आहेत.
पुण्यात श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ व मानाच्या पाच मंडळांनीही यंदा स्तुत्य निर्णय घेतले आहे. मंडळांकडून आगमन आणि विसर्जन मिरवणुका टाळणे, ऑनलाइन आरती पाहण्याची सोय करणे, मंडपात होणारी गर्दी टाळणे, खर्चाला फाटा देऊन विधायक उपक्रम राबवणे अशी पावले टाकली जात आहेत. अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदा आरोग्य उपक्रमावर भर देण्याचे ठरवले असून त्यात महाप्रसादाऐवजी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप करणे, प्लाज्मा दान करण्याची शिबिरे भरवणे आदींवर भर दिला आहे. तसेच कृत्रिम तलावात मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. हे सर्व प्रयत्न उत्सवांचे सकारात्मक रूप दर्शवणारे आहेत.
मागील काळात सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये वाढत चाललेल्या गैरप्रकारांमुळे सर्वस्तरीय टीका होत होती. पण हळूहळू त्यात बदल होत गेला. यंदा गणेशोत्सवाचे एक अनोखे रूप पाहायला मिळणार आहे. “एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ ही भारतीय संस्कृतीची शिकवणूक जोपासली जाणार आहे. यातून या उत्सवाचं मांगल्य, आनंद वृद्धिंगत होण्याबरोबरच तो अधिक प्रगल्भ होताना दिसेल. ही प्रगल्भता सर्वांठायी दिसावी, हीच गणरायाकडे प्रार्थना!