-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
चीनने भारताच्या आर्थिक व्यवस्थेमध्ये घुसखोरी केली होतीच याची आपल्याला कल्पना आहे. भारत त्या घुसखोरीला थांबवण्याचा प्रयत्नही करत आहे. चीनची लडाखमध्ये झालेली घुसखोरी अजूनही परत गेलेली नाही आणि लवकर जायचे लक्षणही दिसत नाही. याच वेळेला चीन अजून एका आघाडीवर भारताविरुद्ध एक नवीन युद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात भारताच्या शिक्षण क्षेत्रात घुसखोरी म्हणजेच विद्यापीठांमध्ये घुसखोरी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
ऑस्ट्रेलियाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक ठिकाणी सायबर हल्ले झाले आहेत. चीनने ऑस्ट्रेलियन संसद आणि विद्यापीठाच्या कॉम्प्युटर सिस्टिममध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठात एक सायबर हल्ला झाला होता, त्यासाठी चिनी हॅकर्सना जबाबदार मानले जाते. आता पूर्ण ऑस्ट्रेलिया जागरूक झालेला आहे. त्यांनी या सर्व कारवायांवर लक्ष ठेवण्याच्या योजना तयार केल्या आहेत. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या शैक्षणिक संस्थांना नवीन मार्गदर्शक धोरणे पाळण्याचे निर्देश द्यावे लागले, ज्यामुळे चीनचा अशा प्रकारचा प्रवेश थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नुकतेच भारताने आपले नवे शिक्षण धोरण जाहीर केले. त्यामध्ये एक मुद्दा होता की आज लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणाकरिता परदेशात जातात; कारण तिथले शिक्षण अधिक दर्जेदार आहे, असे त्यांना वाटते. परदेशात विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मर्यादित आहे कारण ते आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. त्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा असे देश सामील आहेत. म्हणून भारत सरकार या देशातील प्रसिद्ध विद्यापीठांना भारतामध्ये त्यांची शाखा उघडण्याची परवानगी देण्याची शक्यता आहे.
जगातल्या प्रसिद्ध 548 वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये चीनने घुसखोरी केलेली आहे. त्यांचे बजेट हे 154 कोटी डॉलर्स एवढे मोठे आहे. हजारो शाळांमध्येही चीनने प्रवेश केला आहे. घुसखोरी म्हणजे चीन नेमके काय करतो तर चीनची भाषा- मॅंडरीन शिकवणे, चिनी संस्कृतीविषयी शिकवणे किंवा चीनविषयी माहिती देणे. यामध्ये काही तक्रार नाही. परंतु विद्यापीठांमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार केला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापक या प्रसाराला बळी पडून त्यांच्या मनामध्ये चीनच्या कम्युनिस्ट पार्टीची घुसखोरी होते. विद्यापीठातील ही घुसखोरी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या मनामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ते चीनचे पाठीराखे किंवा समर्थक म्हणून काम करू शकतात आणि भारतात हिंसाचार करणाऱ्या माओवाद्यांचे समर्थक बनतात.
चीनने अशाच प्रकारची घुसखोरी ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये केली. त्यानंतर त्यांनी तिथे दादागिरी सुरू केली. अशा विद्यापीठांमध्ये चीनविरोधात काहीही कार्यक्रम झाला तर त्यांनी त्याला थांबवायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ, उघ्यूर मुस्लिमांवर होणारे अत्याचार, तिबेटी आणि चीनमधल्या अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार, तसेच चीन जगाला कसे कर्जबाजारी करते आहे, यावर होणारी चर्चा किंवा परिषदा थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्या त्या देशांना ते थांबवणे भाग पाडले आहे. विविध विद्यापीठांत चीन तिथे काय चालते, यावर लक्ष ठेवून चीन विरोधात कुठलीही कारवाई झाली तर ती थांबवण्याचा प्रयत्न करतात.
यामध्ये त्यांना तुर्कस्तानसुद्धा मदत करत आहे. तुर्कस्तान हा देश जम्मू-काश्मीरमधील फक्त मुस्लीम विद्यार्थांनाच शिष्यवृत्ती देऊन तुर्कस्तानात आणू इच्छितो. जिथे या विद्यार्थ्यांच्या मनात कट्टरता पेरली जाते आणि तिथे आल्यानंतर पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय या विद्यार्थ्यांशी संपर्क करून त्यांना आपल्या बाजूने म्हणजे उग्रवादी बनवणे किंवा दहशतवाद्यांचे समर्थक बनवण्याचा प्रयत्न करतात. चीनची घुसखोरी हा एक दीर्घकाल कार्यक्रम आहे. यावर लक्ष ठेवावे असे भारताच्या गुप्तहेर संस्थांनी सांगितले आहे.
विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना अशा प्रकारच्या दुष्प्रचाराला बळी पडू शकतील. म्हणून त्यांच्या कोवळ्या मनावर अशा विचारांचा पगडा बसू न देणेच योग्य ठरेल. चीनने आज भारतामधल्या अनेक विद्यापीठांत आपले विभाग सुरू केले आहेत. शक्य झाले तर ते विभाग बंद पाडायला पाहिजे किंवा त्यांच्या कामकाजावर पूर्ण लक्ष ठेवले पाहिजे. जशी आपण विविध क्षेत्रात झालेली चिनी घुसखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करतो आहे त्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रात झालेली घुसखोरीसुद्धा थांबवण्याचा प्रयत्न लगेचच झाला पाहिजे.
इतर देशांतील विद्यापीठांना भारतात प्रवेश करू दिला तरीही चीनमधील कोणत्याही विद्यापीठांना भारतामध्ये येऊ देऊ नये. कारण त्यांच्याकडून भारतविरोधी कारवाया करण्याची शक्यता फार जास्त आहे. अनेक विद्यार्थी चीनचे वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सवरून त्यांनी भारतविरोधी लिहिलेल्या लिखाणाचा भारतातील सोशल मीडियावर प्रसार करतात. यामुळे चीन भारताविरुद्ध काय बोलतो आहे हे आपल्या सोशल मीडियामध्ये पसरवले जाते. त्यामुळे अनेकांना असे वाटते की भारत जे करतो आहे ते बरोबर नाही. चीन मात्र अधिक योग्य वागतो आहे.
चीनची भारतीयांच्या मनामध्ये विद्यापीठीय शिक्षणाच्या माध्यमातून सुरू असलेली घुसखोरी थांबवण्यासाठी आपण लगेचच पावले उचलली पाहिजे. ऑस्ट्रेलियासारख्या प्रगत देशावर चिनी प्रभाव वाढू शकतो तर भारतासारख्या विकसनशील देशाचे काय. भारतातील अनेक संस्थांना परेदशातून गैरकानुनी मदत मिळत होती. ती थांबवण्यात आपल्याला यश मिळाले होते.
भारतीयांनी आपल्या देशात सुरू असलेल्या विविध प्रकारच्या चिनी घुसखोरीकडे सावधगिरीने पाहण्याची गरज आहे. कारण याचाच फायदा घेऊन चीन आणि भारताचे शत्रू भारताविरोधातील धोरणे देशात मंजूर करून आपल्या राष्ट्रीय हितांना धक्का लावू शकतात. त्यामुळे भारतीय जनतेने आपले राष्ट्रीय हित कशामध्ये आहे हे समजून घेऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे. अन्यथा ऑस्ट्रेलियामध्ये ज्या प्रकारे चिनी घुसखोरी सुरू आहे तशी ती भारतात होण्याची शक्यता नाकारू शकत नाही.