मित्राचे अपघातात निधन झाल्यानंतर घेतला निर्णय
पटना : दुचाकी चालवत असताना डोक्यावर हेल्मेट घालणं नेहमीच महत्त्वाचे असते. याबाबत निष्काळजीपणा करणाऱ्यांच्या नशीबी अनेक वेळा मृत्यू येतो असाच अनुभव घेतलेल्या एका तरुणाने आपल्या मित्राच्या मृत्युनंतर तब्बल 55 हजार चालकांना मोफत हेल्मेटचे वाटप केले.
या युवकाच्या मित्राचे निधन दुचाकी अपघातानंतर झाले होते व दुचाकी चालवत असताना या मित्राने हेल्मेट परिधान न केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाला होता. राघवेंद्र कुमार असे या तरुणाचे नाव असून त्याच्या कृष्णा ठाकूर या मित्राचे निधन 2014 मध्ये अपघातात झाले होते. त्यानंतर त्याने अनेक दुचाकी चालकांना मोफत हेल्मेट देण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे आत्तापर्यंत 55 हजार दुचाकी चालकांना मोफत हेल्मेटचे वाटप केले आहे.
28 राज्यांमध्ये ही मोहीम राबवली असून त्यासाठी त्याने आत्तापर्यंत तब्बल दोन कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याच्या या कामाचे कौतुक सर्व स्तरावरून केले जात असून तो आता हेल्मेट मॅन या नावाने ओळखला जातो. 34 वर्षीय राघवेंद्र कुमार बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील असून 2009 मध्ये तो दिल्लीमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आला होता तेव्हा त्याची ओळख कृष्णा ठाकुर या तरुणाची झाली दोघांमध्ये गाढ मैत्री झाली.
2014 मध्ये कृष्णा ठाकूरचे अपघाती निधन झाल्यावर मात्र राघवेंद्र कुमारचे आयुष्यच बदलून गेले आणि त्याने दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे किती महत्त्वाचे आहे याबाबत प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला त्या प्रबोधन मोहिमेचा एक भाग म्हणूनच त्याने मोफत हेल्मेट वाटप करण्याचाही निर्णय घेतला होता.
हे सर्व काम त्याने स्वतःच्या मेहनतीवर केले त्यासाठी कोणाची आर्थिक मदत घेतली नाही. स्वतःचा फ्लॅट जमीन आणि पत्नीचे दागिने विकून त्याने मोफत हेल्मेटची मोहीम राबवली आत्ता सध्या त्याच्यावर 13 लाखाचे कर्ज असूनही यापुढेही ही मोहीम अशाच प्रकारे राबवण्याचा निर्णय त्याने घेतला आहे त्याच्या या मोहिमेला सरकारने पाठबळ द्यावे अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.