पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास
येरवडा (प्रतिनिधी)- डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अभयारण्य परिसरातील महसूल विभागाकडील क्षेत्र हे वन विभागाकडे हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान, 2030 पर्यंत “पुणे कार्बन न्यूट्रल सिटी’ कसे बनेल, यासाठी एकेक पाऊल पुढे टाकत आहोत, असे मत पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
येरवडा येथील डॉ. सालीम अली पक्षी अभयारण्याला रविवारी पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे,आमदार सुनील टिंगरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त मनपा आयुक्त कुणाल खेमणार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, युवासेना सहसचिव किरण साळी, नगरसेवक संजय भोसले, विशाल धनवडे आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, मागील दोन आठवड्यांत पक्षी अभयारण्य परिसरातील दहा हजार टन राडारोडा काढून टाकला आहे. याशिवाय, येत्या काळात पुणे महापालिकेने स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविणार आहोत. अभयारण्य परिसरात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून संरक्षणाच्यादृष्टीने या परिसरात बीट चौकी उभारण्याची सूचना पोलीस आयुक्तांना केली आहे. गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी परिसरातील सीसीटीव्हीत वाढ करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
…सध्या राडारोडा काढून टाकण्याचे काम सुरू
पुणे महापालिकेत झालेला गोंधळ तसेच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर आरोप केले असून याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर आम्ही सगळीकडे राडारोडा काढून टाकण्याचे काम करतो आहोत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.