सासवड/जेजुरी – जेजुरी येथे 23 जुलै रोजी होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हवामान विभागाकडून राज्यासह पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे समजते. हा कार्यक्रम चौथ्यांदा रद्द झाल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
राज्यभरात “शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम मोठा गाजावाजा करत केला जात आहे. कोट्यावदींचा खर्च या आलिशान कार्यक्रमासाठी केला जात आहे. पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे मागील महिन्यात 3, 8, 13 जून व आता 23 जुलैला कार्यक्रमाचे भव्य दिव्य आयोजन केले होते. एक लाख चौरस फुटांचा भव्य मंडप तोही वॉटरप्रुफ, भव्य स्टेज बांधून तयार आहे. गेली दहा दिवस या मंडपाचे भाडे सुरु असल्याचे समजते.
मागील 13 तारखेला तर स्टेजवर एलईडी स्क्रीन, अत्याधुनिक साऊंड सिस्टिम, एक लाख खुर्च्या कार्यक्रमस्थळी पोहचल्याही होत्या. दोन हेलिकॅप्टर उतरतील असे हॅलीपॅडही तयार करण्यात आले होते. ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना एसटी बसची सोयही करण्यात आली होती. इलक्ट्रिकल सामग्रीची चाचणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली होती. या सर्व तयारीसाठी किमान एक कोटींचा खर्च आल्याची चर्चा होती.
शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी लाभार्थी निवड प्रक्रिया गेली दोन महिन्यांपासून सुरू होती. या कार्यक्रमानिमित्ताने लाभार्थ्यांना कागदपत्रे, शासनाच्या अनुदानाच्या वस्तू, विद्यार्थ्यांचे विविध दाखले तसेच रोजगार मेळाव्यचे आयोजन केले होते. या सर्व लाभार्थ्यांना आता परत नव्या तारखेकडे डोळे लावून बसावे लागले असून, पुन्हा प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. यापुर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीमंडळातील नेत्यांच्या वेळेनुसार कार्यक्रम लांबत होता. पण आता निसर्गाला ही हा कार्यक्रम होऊ द्यायचा नसल्याने गोरगरीब लाभार्थ्यांच्या हिरमोड होतो आहे.
मला मुख्यमंत्री कार्यालय कडून भ्रमणध्वनीद्वारे हा कार्यक्रम काही कारणास्तव पुढे ढकलण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.
-डॉ. अमिता पवार, गटविकास अधिकारी पुरंदर पंचायत समिती