कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदा झाली घासुन लढत
पुष्पाताई काळे यांचे डोळे पाणावले
आशुतोष काळे विजयी झाल्यानंतर मतमोजणी केंद्रावर आले असता त्यांनी आई पुष्पाताई काळे यांना पाणावलेल्या डोळयांनी मिठी मारून आपल्या आंनद आश्रुला वाट मोकळी केली. तर त्यांच्या पत्नी चैताली काळे याही भावुक झाल्या. यावेळी आत्या लता शिंदे, चुलते संभाजी काळे, डॉ. अतिष काळे, डॉ. अजय गर्जे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, संदिप वर्पे, सुनिल गंगुले, दिनार कुदळे, ऍड. शंतनु धोर्डे, ऍड. विनायक सदाफळ, कृष्णा आढाव, आदी उपस्थित होते. निवडणुक निर्णश अधिकारी राहुल मुंडके यांनी आशुतोष काळे यांना आमदार झाल्याचे शासकीय प्रमाणपत्र सन्मापुर्वक दिले.
कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी भाजपच्या उमेदवार आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 822 मतांनी पराभव केला. शेवटच्या क्षणापर्यंत घासुन झालेल्या लढतीत काळे यांनी विजय मिळवुन काळे घराण्याकडे दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शहरातील सेवानिकेतन विद्यालयात सकाळी 8 वाजल्यापासुन सुरू झाली. 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानामध्ये 2 लाख 64 हजार 822 मतदारांपैकी 2 लाख 1 हजार 874 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी आशुतोष काळे यांना 87 हजार 566 मतदारांनी मतदान केले. तर भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांना 86 हजार 744 मतदारांनी मतदान केले. कोल्हे यांच्यापेक्षा 822 मते मिळवुन काळे विजयी झाले. मतमोजणीच्या 20 फेऱ्या झाल्या. पहिल्या फेरीपासुन ते तिसऱ्या फेरीपर्यंत काळे यांनी 2 हजार 915 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर चौथ्या फेरीपासुन काळे यांची मतांची आघाडी कमी होत गेली. सहाव्या फेरीपासुन स्नेहलता कोल्हे यांनी 1 हजार 183 मतांची आघाडी घेतली. सातव्या फेरीमध्ये कोल्हेंनी 3 हजार 252 मतांची आघाडी घेतली, परंतु अकराव्या फेरीपर्यंत कोल्हेंचे मताधिक्य घटत गेले.
आणि बाराव्या फेरीमध्ये काळे यांनी कोल्हेंचे मताधिक्य कमी करून 2 हजार 314 मतांनी पुन्हा आघाडी घेतली. सोळाव्या फेरीपर्यंत काळे यांनी 3 हजार 515 मतांची आघाडी घेतली, परंतु हळुहळु काळेंचे मताधिक्य घटु लागले. त्यामुळे शेवटच्या तीन फेऱ्यात कोण विजयी होईल, याचा अंदाज लागत नव्हता. 19 व्या फेरीमध्ये काळे यांना केवळ 454 मतांची आघाडी मिळाल्याने काळे-कोल्हेंच्या विजयामधील रंगत वाढत गेली.
दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही उमेदवार व त्यांचे प्रमुख कार्यकर्ते मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला. शेवटच्या 20 व्या फेरीमध्ये काळे यांनी 689 मतांची आघाडी मिळाल्याने काळेंचा विजय निश्चित झाला. काळे गटात एकच जल्लोष सुरू झाला.विजय घोषित झाल्यानंतर आशुतोष काळे तब्बल दिड तासाने मतमोजणीच्या ठिकाणी येवुन सर्वांचे अभिनंदन स्विकारले.
या निवडणुकीमध्ये उमेदवारांनी मिळालेली मते पुढील प्रमाणे आहे.आशुतोष काळे – 87 हजार 566 (राष्ट्रवादी) विजयी, स्नेहलता कोल्हे – 86 हजार 744 (भाजप), राजेश नामदेवराव परजणे – 15 हजार 446 (अपक्ष), विजय वहाडणे – 4 हजार 47 (अपक्ष), अशोक गायकवाड – 3 हजार 914 (वंचित), माधव त्रिभुवन – 615 (बहुजन समाज पार्टी), मगन आहिरे – 580 (अपक्ष), दिपक साळुंके – 557 (अपक्ष), अलिम शहा – 337 (अपक्ष), शिवाजी कवडे – 224 (बळीराजा पार्टी), राजेश सखाहरी परजणे -246 (अपक्ष), सुदाम उकिरडे- 123 (अपक्ष), शितल कोल्हे – 275 (अपक्ष), अशोक नामदेव काळे – 244 (अपक्ष) असे मते उमेदवारांना मिळाल्याची माहिती देवनु सर्वाधिक मते मिळविलेले आशुतोष काळे यांना निवडणुक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी विजयी घोषित केले. तर यापैकी कोणताही उमेदवार नको म्हणुन नोटाला 1 हजार 622 मतदारांनी मतदान करून नकार दर्शविला.
दरम्यान, टपाली मतदानातुन आशुतोष काळे यांना 323, स्नेहलता कोल्हेंना 167 मते मिळाली. सैनिकी 30 मतापैकी 23 मते कोल्हे यांना तर 7 मते काळे यांना पडली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके व तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली. कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी योग्य ती काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती. मतमोजणीच्यावेळी सुरक्षेची काळजी घेण्याकरीता पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी चोख पोलीस बंदोबस्त लावाला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतमोजणी प्रक्रिया पुर्ण झाली.