नव्या सत्ता स्थापणेसाठी अमोल कोल्हेंचे संकेत
मुंबई : विधानसभा निवडणुकीचे निकालाने अनेक दिग्गजांना धक्का दिला आहे. परंतू, राज्यात युतीचेच सरकार येणार हे देखील तेवढेच खरे आहे. तर दुसरीकडे नव्या समीकरणांच्या चर्चेने राजकीय वर्तुळात वेग घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस असे नवे समीकरण जुळून आणण्यासाठी राजकीय नेत्यांचे प्रयत्न सुरू झाल्याचे दिसत आहे. या नव्या समीकरणावर राष्ट्रवादीचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भाष्य वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होत असेल तर त्याचे स्वागत करेल, असे मत कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीच्या विजयात महत्त्वाची भूमिका असलेल्या खासदार अमोल कोल्हे यांनीही नव्या समीकरणाचे स्वागत करू असे म्हटलं आहे. निवडणूक निकालाविषयी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, प्रचाराच्या काळात भाजपाकडून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुद्यांना बगल देण्याचा प्रयत्न झाला. कलम 370 सारखे प्रश्न त्यांच्याकडून वारंवार पुढे आणण्यात आले. ग्रामीण भागातील मतदार असंख्य समस्यांना तोंड देत असताना त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. यामुळेच ग्रामीण महाराष्ट्राने भाजपाला नाकारले. प्रचारासाठी आणखी अवधी मिळाला असता, तर शहरी महाराष्ट्रानेही युतीला नाकारले असते, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
प्रचाराच्या काळात शरद पवार महाराष्ट्रभर फिरले. त्यांचा वावर हा प्रेरणा देणारा होता. विशेष म्हणजे तरुणांनी शरद पवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे चांगला निकाल महाराष्ट्रातून आला. शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस असं हे समीकरण चर्चेत आहे. पण, त्याविषयी पक्ष निर्णय घेईल. पक्षाने तसा निर्णय घेतला, तर स्वागतच करेल, असे कोल्हे म्हणाले.