नगर – नगर जिल्ह्याची ओळख राजकारणात सोधा म्हणजेच सोयरेधायरे पक्ष जपणारा जिल्हा म्हणून राज्यात ओळख आहे. प्रत्येक नेता आपले नातेसंबंध जपत आपले राजकारण करत असल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. विधानसभा निवडणूकही त्यास अपवाद ठरली नाही. राहुरी मतदारसंघातून माजी आ. शिवाजी कर्डिले भाजपकडून निवडणूक रिंगणात होते. तसेच नगर शहर मतदारसंघातून त्यांचे जावई आ. संग्राम जगताप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढवित होते. या निवडणुकीत जावयाने दुसऱ्यांदा विजय मिळविला. मात्र सासरेबुवांना पराभवाची चव चाखावी लागली.
नगर जिल्ह्यात सोधा पक्ष नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याने राजकीय गणिते जुळवत इतर नेत्यांशी आपले नातेसंबंध जळवून आणले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षात या नेत्यांचे नातेवाईक असलतात. त्यामुळे सत्तेत असो किंवा नसोत, सत्तेचे फायदे मात्र त्यांच्या पदरात पडत असतात. ही विधानसभा निवडणूकही सोधा पक्षाला अपवाद नव्हती. राहुरी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात होते.
सलग पाच वेळा कर्डिले यांनी विजय मिळविला होता. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवही पचवावा लागला होता. ते सहाव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र मतदारसंघात त्यांच्या विषयी नाराजी असल्याने राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा सुमारे 36 हजार मतांनी त्यांचा पराभव केला. मागील पाच निवडणुकांत पराभवाला पाठ दाखवणाऱ्या कर्डिले यांना पाचव्या निवडणुकीत मात्र पराभवाची चव चाखावी लागली.
त्यांचे जावई आ. संग्राम जगताप हे देखील नगर शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांनीही आपले सासरे शिवाजी कर्डिले यांच्या मदतीने महापालिकेत महापौरपद, त्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला होता. त्यावेळी भाजप व शिवसेना वेगवेगळे लढल्याने त्यांचा विजय झाला असे, सांगितले जात होते. मात्र या निवडणुकीत भाजप, शिवसेनेची युती असुनही आ. जगताप यांनी सुमारे अकरा हजार मतांनी शिवसेनेचे माजी आ. अनिल राठोड यांचा पराभव केला. आ. जगताप यांनाही लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. या निवडणुकीत जावयाचा विजय झाला. मात्र सासऱ्यांचा पराभव झाल्याने जगताप-कर्डिले परिवारात कभी खूषी कभी गम असे वातावरण होते.