-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)
मागच्या महिन्यामध्ये चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी राष्ट्राला संबोधित करताना अन्न वाया घालवू नका, असे आवाहन केले. जिनपिंग यांनी “क्लीन युवर प्लेट’ मोहिमेची नवीन आवृत्ती मागच्या महिन्यात लॉंच केली.
चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या अहवालानुसार जिनपिंग यांनी अन्नाची नासाडी धक्कादायक आणि निराशाजनक असे वर्णन करीत या विषयावर जनजागृती करण्यास सांगितले आहे. चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने (सीजीटीएन) जिनपिंग यांचे मत मांडले की, चीनने बऱ्याच वर्षांपासून बंपर उत्पादन केले असले तरीही अन्न सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. लगेचच सरकारी माध्यमांनी वेगवेगळ्या मंचांमध्ये अन्न वाया घालवू नये म्हणून जनतेला प्रोत्साहित करण्यास सुरुवात केली. चिनी ग्राहक मोठ्या शहरांमध्ये रोज 17 ते 18 टन अन्न वाया घालवत आहे. परंतु या त्यांच्या आवाहनाचा काही परिणाम झालेला दिसत नाही. दोन-चार दिवसांपूर्वी व्हिएतनाम मीडियामध्ये आलेल्या बातम्यांप्रमाणे चिनी नागरिकांची व्हिएतनाममध्ये होणारी घुसखोरी वाढली आहे. अनेक चिनी नागरिक कामाकरता आणि अन्नाकरता घुसखोरी करत आहेत. अनेक चिनी नागरिक पकडले गेलेले आहेत. चीनमध्ये महागाई वाढल्यामुळे त्यांना पुरेसे अन्न तिथे मिळत नाही.
व्हिएतनाम सीमेवर चीनची नवीन भिंत
व्हिएतनाम सीमेवर चीन एक नवीन भिंत बांधतो आहे. ज्यामुळे चिनी नागरिकांना व्हिएतनाममध्ये पळून जाता येणार नाही. भारतासारखा देश भारत-बांगलादेश सीमेवरती कुंपण लावतो कारण बंगलादेश नागरिकांची भारतामध्ये घुसखोरी होऊ नये म्हणून. परंतु जगाच्या इतिहासामध्ये असे उदाहरण समोर येत आहे की ज्यामध्ये चीन आपल्या नागरिकांनी व्हिएतनाममध्ये जाऊ नये म्हणून भिंत बांधतो आहे. अशाच प्रकारची बर्लिनची भिंत सोव्हिएत युनियनने इस्ट आणि वेस्ट जर्मनीमध्ये बांधली होती. एकीकडे चीनचे लढाईचे आक्रमक स्वरूप अन् दुसरीकडे देशात नागरिकांकरता “खायचे संकट,’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण, जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आणि महासत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या चीनवर अशी वेळ का यावी?
चिनी कृषिक्षेत्राला जोरदार फटका
चिनी व्हायरसमुळे चीनच्या कृषिक्षेत्राला जोरदार फटका बसला आहे. चीनमधील पूरस्थिती आणि टोळधाडीच्या संकटानेही शेतीचे अतोनात नुकसान झाले. परिणामी, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सरकारला विकण्याऐवजी त्याची साठेबाजी सुरू केली आणि अन्नधान्यांच्या किमती गगनाला भिडल्या. त्यामुळे चीन सरकारने आता साठेबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना कारवाईची धमकी दिली आहे. हे करताना मात्र चीनने अन्नधान्याच्या आदान-प्रदानासंबंधीच्या इतर देशांशी असलेले करार, चीन विरोधात गेल्यामुळे संपुष्टात आणले आणि त्यामुळे चीनमधील खाद्यान्न संकट गहिरे होत आहे.
मांस सहजासहजी आयात करता न आल्याने आणि भीतीने मोठ्या संख्येने डुकरांची कत्तल केल्यामुळे चीनमधील पोर्कच्या किमतींमध्ये 86 टक्के वाढ झाली. तसेच चीनच्या आकडेवारीनुसार, यंदा अन्नधान्याच्या आयातीत 22.7 टक्क्यांची वृद्धी झाली असून, खाद्यान्न आयात ही 74.51 दशलक्ष टन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गहू, ज्वारी असो की सोयाबीन, चीनमधील सगळ्याच पिकांचे उत्पादन प्रचंड घटल्यामुळे चीनवर आज अन्नधान्य आयात करण्याची वेळ ओढवली.
यावर्षी चीनच्या अन्नधान्य महागाईत 13.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सामान्यतः लागणारे बहुतेक खाद्यपदार्थ फार महाग झाले आहेत. चीनची गहू आयात सात वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. जून 2020 मध्ये 9 लाख 10 हजार टन गहू आयात केला. याचा अर्थ मागच्या वर्षीच्या तुलनेत 197 टक्क्यांची वाढ झाली. याव्यतिरिक्त, त्याने 8 लाख 80 हजार टन कॉर्न, 6 लाख 80 हजार टन ज्वारी आणि 1 लाख 40 हजार टन साखर आयात केली आहे. चीनमधील पीकउत्पादन इतके कमी झाले आहे की, जून-जुलैमध्ये चीनच्या राज्य शासनाच्या धान्य राखीव यंत्रणेत केवळ 45 दशलक्ष टन गहू खरेदी केला जाऊ शकतो. जो मागील वर्षाच्या तुलनेत 17.2 टक्के कमी आहे. महापुरामुळे हजारो एकरात उभी पिके नष्ट झाली, जी चीनसाठी आपत्ती ठरली. या पुराचा परिणाम 54.8 दशलक्ष लोकांच्या जीवनावर झाला आहे आणि 20.8 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले आहे.
विविध देशांत शेतजमिनी खरेदी
चीनमध्ये विविध कारणास्तव गेल्या वर्षीच्या तुलनेत 60 हजार 900 हेक्टर इतके कृषिक्षेत्र कमी झाल्याचे समजते. आता या सगळ्यावर उपाय म्हणून चीनने 94 अब्ज अमेरिकन डॉलर्स खर्च करून विविध देशांत शेतजमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. अन्नधान्य आणि अन्नधान्याच्या उत्पादनातील दरी दूर करण्यासाठी चीनने जिबूझी, नायजेरिया, झिम्बाब्वे, चिली, अर्जेंटिना, कंबोडिया, लाओस इत्यादींसह अनेक आफ्रिकन, दक्षिण अमेरिकेत सुपीक जमीन खरेदी व भाड्याने घेण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील सुपीक शेतजमिनींसाठी चीनने करार करून ती घशात घातली आहे. त्यामुळे आता बंदरे आणि इतर मूलभूत प्रकल्पांच्या नावाखाली विविध देशांमधील जमिनी हडपणारा चीन, आता अन्नसंकट टाळण्याकरता जमिनी गिळंकृत करत आहे. पैशांसाठी जमीन चीनला विकणाऱ्या देशांनी याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.
कृषीव्यवस्था सावरण्याचे मोठे आव्हान
आगामी काळात चीनसमोर आपली कृषीव्यवस्था सावरण्याचे मोठे आव्हान असेल. चीनमध्ये अन्नधान्याची आयात ही 15 बिलियन डॉलर्स पासून वाढून आता 105 बिलियन डॉलर्स एवढी झाली आहे. म्हणजे चीनला आपल्या दीडशे कोटी नागरिकांना अन्न पुरवण्याकरता प्रचंड प्रमाणामध्ये जगातल्या वेगवेगळ्या देशांतून अन्नधान्याची आयात करावी लागते. परंतु आता चिनी व्हायरसमुळे आणि चीनच्या आक्रमक कारवाईमुळे सगळे देश चीनवर नाखूश आहेत. त्यामुळे चीनच्या अन्न संकटाची तीव्रता येणाऱ्या दिवसांमध्ये वाढू शकते. म्हणून या महत्त्वाच्या विषयावरून चिनी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच भारत, तैवान, अमेरिका, जपान व इतर देशांबरोबर चीन युद्धजन्य स्थिती निर्माण करताना दिसतो.