- धुलिकणांचे प्रमाण 130 मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्यूबपर्यंत
- पोहचले शहरभर सुरू असलेल्या कामांचा परिणाम
पिंपरी : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस प्रदूषणामध्ये वाढ होत आहे. शहरात सुरू असलेल्या खोदकामांमुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य शहरभर पसरले आहे. 24 तास पाणीपुरवठा योजना, मेट्रो, उड्डाणपूल यांचे काम सुरू आहे. मात्र या कामामुळे शहरात धुळीचे लोट पसरलेले दिसत आहे. शहरात हवेतील धुलिकणांचे प्रमाण 130 मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्यूबपर्यंत पोहचले आहे. त्यामुळे यंदा नागरिकांची दिवाळी धूळीत जाणार आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
हवेतील धुलिकणांचे दर महिन्यांचे प्रमाण हे शंभर मायक्रोग्रॅंम प्रतिमीटर क्यूब तर नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण हे 80 मायक्रोग्रॅम प्रतिमीटर क्यूब असणे निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रमाण वाढताना दिसत आहे.
पाऊस थांबल्यापासून शहर व उपनगरांमध्ये रस्त्यावर धूळ पसरल्याचे चित्र आहे. भक्ती शक्ती चौक, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपरी या भागामध्ये सकाळपासूनच हवेमध्ये धुलिकण असल्याचे दिसून येते. या भागामध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. तसेच निगडी येथील चौकामध्ये उड्डाणपूलाचे काम सुरू आहे. कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र धूळ पसरत आहे. रस्त्यावर पसरलेली धूळ वाहनांमुळे हवेत पसरते. त्यामुळे प्रवासी व वाहनचालकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
स्वच्छता अभियानामध्ये देशातील शहरांमध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश आहे. विविध क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवड शहर प्रगती करत आहे. मात्र प्रदूषण थांबविण्यामध्ये अपयश येत असल्याचे दिसत आहे. अनेक दिवसांपासून हवा प्रदूषणामध्ये भर पडत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने यांत्रिक पद्धतीने रस्त्यांची साफसफाई सुरू केली आहे. मात्र अनेक उपनगरांमध्ये शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते.
विशेषकरून रुपनीगर, तळवडे, कासारवाडी येथील रस्त्यांची सफाई वेळेत होत नसल्याचे समोर आले आहे. नाशिक फाटा येथील उड्डाणपूलावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे लोट असतात. उड्डाणपूलाशेजारी मेट्रोचे पिलर बनविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याठिकाणच्या हवेमध्ये सिमेंटचे कण पसरलेले असतात. त्यामुळे नागरिकांना डोळ्यांच्या तक्रारी भेडसावत आहेत. पुणे मुंबई रस्त्यावरील ग्रेड सेपरेटरमधील रस्त्याच्या कडेला शोभेची झाडे लावली आहेत. मात्र या झाडांच्या पानावर मोठ्या प्रमाणावर धूळ असते. या झाडांच्या स्वच्छतेकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
आरोग्यासाठी घातक
सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. यामुळे हवेतील बारीक धुलिकण बराच काळ हवेतच राहतात. ते आरोग्याला घातक ठरतात. श्वास घेताना ते आपल्या फुफ्फसात जाऊन आजार होण्याची शक्यता असते. शहरातील काही परिसरांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात धूळ झाली आहे की ती घरांमध्ये देखील शिरत आहे. अन्नावाटे ही धूळ शरीरात जाऊ नये, यासाठी बाहेरील खाद्य पदार्थ टाळणे गरजेचे आहे. तसेच करोनामुळे वापरण्यात येत असलेले मास्क सध्या उपयोगी ठरताना दिसतात. श्वासावाटे धूळ जाऊ नये, यासाठी मास्कचा वापर सातत्याने करावो, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
शहरामध्ये सुरू असलेल्या विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही. मात्र ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यास ठेकेदार टाळाटाळ करतात. वर्दळीच्या ठिकाणी काम सुरू असेल तर आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये या परिसरात रात्रीच्या वेळी काम होणे आवश्यक आहे. तसेच अनेक औद्योगिक परिसरातील कारखान्यांमधून रस्त्यावर सांडपाणी सोडले जाते. अशा कारखानदारांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
- शहरातील प्रदूषण वाढले.
- विविध विकासकामांचा फटका
- रासायनिक कंपन्या पसरवतायेत दुर्गंधी
- ठोस उपायोजना करण्याची मागणी