पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्यातील कल्याणीनगरमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा जीव गेला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले. या अपघाताची चर्चा देशभरात झाली; पण पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार अद्याप तरी घटनास्थळी पोहोचलेले नाहीत.
पहाटे लवकर उठून सकाळपासूनच बैठकांचा धडा लावणारे, ग्राउंडवर जाऊन काम करणारे, अधिकाऱ्यांना सूचना देणारे अजित पवार पुण्याच्या कल्याणीनगरची इतकी भयंकर घटना घडल्यानंतरही आहेत कुठे? ते पुण्यात फिरकले का नाहीत? अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.
बारामती, शिरूरमधील मतदान झाल्यानंतर अजित पवार फारसे सक्रिय दिसलेले नाहीत. त्यामुळे अजित पवारांना नेमकं झालंय काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरेंनी आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले आहेत. त्यामुळे ते संशयाच्या भोवऱ्याच्या सापडले आहेत. याची चर्चा मागील दोन दिवस समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
सुप्रियाताई गप्प का : नीतेश राणे
देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रियाताई गप्प का? त्यांचा अग्रवाल कुटूंबीयांशी संबंध आहे का? असा सवाल भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, पुण्यातील अपघातप्रकरणी शरद पवार गटाकडून कोणती प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही? आरोपीचे वकील हे शरद पवारांचे निकटवर्तीय असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी आयुक्तालयात बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली. त्यामुळे मुलावर कडक कारवाई सुरू आहे.
तर हे प्रकरण दाबले गेले असते
दरम्यान, आमदार रवींद्र धंगेकरांनी याप्रकरणी एक सविस्तर ट्विट केले आहे. ते म्हणतात, ज्याने आमच्या पुण्यनगरीची इतकी बदनामी झाली, असा पोलीस आयुक्त आम्हाला नको. कल्याणीनगर अपघातात अगोदर जामीन मिळालेल्या मुलाला १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळाली. हे आम्ही दिलेल्या लढ्याला मिळालेले पहिले यश आहे. आपण सर्वांनी जर आवाज उठवला नसता, तर हे प्रकरण दाबले गेले असते.