बारामती – सावकारांच्या त्रासाला कंटाळून पति घरातून निघून गेल्याची तक्रार पत्नीने दिल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच सावकारावर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. दोघांना चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले. सावकारांच्या त्रासाला कंटाळून पती घरातून निघून गेल्याची तक्रार महिलेने पोलिसांत दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे.
तक्रारदार यांचे पती बबन सातपुते (रा. रिया आपारमेंट भिगवन रोड बारामती) यांनी 2021 मध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये बायोमास ब्रिक्वेट्स बनवण्याची कंपनी सुरू केली. कंपनी सुरू करताना सातपुते यांनी संजय प्रल्हाद बोरकर, पोपट सिताराम थोरात, प्रवीण बेदमुथा, दिलीप कोठारी( रा. बारामती )व अळणुरे साहेब ( रा.परभणी )या सावकारांकडून दर महिना पाच टक्के व्याजाने एक करोड नऊ लाख रुपये घेतले होते.
या सर्वांची बरीचशी रक्कम व्याजासहित कारखाना चालू असताना परत केली आहे. परंतु दुर्दैवाने त्यांच्या कारखान्याला तीन मे २०२१ ला आग लागली व त्यामध्ये त्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बाकीची रक्कम ते परत देऊ शकले नाही. त्यानंतर वरील सर्व सावकारांनी त्यांना व्याजासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. इन्शुरन्स मिळाल्यानंतर राहिलेली रक्कम देतो अशी विनंती करून सुद्धा ते त्याला त्रास दिला. त्यांच्या त्रासापोटी पती १७ एप्रिल रोजी घरातून निघून गेले आहेत. ते घरातून निघून गेलेले असताना सुद्धा यातील आरोपी पोपट थोरात हा तक्रारदार महिला घरात असताना बूट घालून तक्रारदार महिलेच्या घरात जाऊन तिला व्याजाच्या पैशासाठी शिवीगाळ करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करून व्याजासाठी जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे सदर महिलेने शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारदार महिलेचे पती अद्याप घरी आलेले नाही. सदर बाबत पोलिसांनी खातरजमा करून वरील सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करून यातील आरोपी पोपट थोरात व संजय बोरकर यांना तात्काळ अटक केली. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायाधीश वाघ धुळे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी अभियोक्ता किरण सोनवणे यांनी पोलिसांच्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक घोडके तसेच पोलीस नाईक संजय जाधव पोलीस नाईक दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, शिंदे, इंगोले यांच्या मदतीने करत आहेत. यापुढे सावकारीचा त्रास होत असेल त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार करावी, तक्रारीची खातरजमा करून कारवाई केली जाईल. कुणीही बेकायदेशीर सावकारांची भीती बाळगू नये. फक्त तक्रारची खातरजमा केली जाईल नंतरच दाखल होईल. असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी स्पष्ट केले.