– 53 कोटींची निविदा जाहीर
– तीन ते चार महिन्यात कामास सुरूवात
पुणे : महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस आणि म्हाळूंगे गावांची पाणी समस्या पुढील काही महिन्यात मार्गी लागणार आहे. या गावांना महापालिकेच्या समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा करण्यासाठी दोन्ही गावांमध्ये नव्याने जलवाहिन्या टाकण्यात येणार असून त्यासाठी सुमारे 53 कोटी 37 लाख रूपयांची निविदा महापालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. या निविदांसाठी एका महिन्याची मुदत आहे. त्यामुळे निविदांची सर्व प्रशासकीय पूर्ण करून पुढील काही महिन्यात प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे.
राज्यशासनाने जून 2021 मध्ये महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट केलेल्या 23 गावांमध्ये सुस आणि म्हाळूंगे गावाचा समावेश आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेच्या हद्दीजवळ असलेल्या या दोन्ही गावांमधे मोठया प्रमाणात नागरिकरण झालेले आहे. त्यामुळे या भागात मोठया प्रमाणात लोकवस्ती वाढलेली आहे. त्यामुळे, ग्रामपंचायतीकडून दिले जाणारे पाणी या भागास कमी पडत होते.त्यानंतर ही गावे पालिकेत आल्यावर महापालिकेने या गावांच्या पाणी पुरवठा योजना ताब्यात घेतल्या. मात्र, त्यानंतरही महापालिकेकडून या गावांना दर दहा ते पंधरा दिवसांनी पाणी दिले जात होते.
त्यामुळे नागरिकांकडून तसेच महापालिकेतील लोकप्रतिनिधींकडून वारंवार या भागास पाणी देण्यासाठी आंदोलने करण्यात आल्यानंतर महापालिकेने या गावांसाठी टॅंकर द्वारे पाणी देण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनीही या दोन्ही गावांना समान पाणी योजनेत पाणी द्यावे अशी मागणी केली होती. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर, महापालिका आयुक्तांनी या गावांमध्ये समान पाणी योजना राबविण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार, आराखडा तयार झाल्यानंतर तसेच या कामास महापालिकेच्या अंदाज समिती ( एस्टीमेट कमिटी) मान्यता मिळाल्यानंतर आता प्रशासनाने या गावांमध्ये जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा जाहीर केली आहे. त्यामुळे, लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरूवात होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या गावांमध्ये समान पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही प्रशासनास याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानंतर, महापालिका प्रशासनाने या योजनेस मान्यता दिली असून शनिवारी त्याची निविदा जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ही दोन्ही गावे टॅंकरमुक्त त्यामुळे, लवकरच या योजनेचे काम सुरू होईल अपेक्षा आहे.
– अमोल बालवडकर ( माजी नगरसेवक)