वाल्हे, (वार्ताहर) – मागील वर्षांपासून केंद्रशासनाने जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत अनेक ठिकाणी या योजना पूर्णत्वास गेल्या नसल्याने, तसेच, मागील वर्षाचा अल्प पाऊस, आटलेले पाणवठे व पावसाळ्यापासूनच, दुष्काळी परिस्थितीने दिलेला तडाखा; यामुळे पुरंदर तालुक्यातील गावांना, वाड्यावस्त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे.सद्यःस्थितीत सुरू असलेल्या अपुर्या टँकरच्या संख्येमुळे दुष्काळाची छाया अधिक गडद होत आहे.
वाल्हे व परिसरामधील अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, गायकवाड वाडी, भुजबळ कामठवाडी, माळवाडी, गायकवाडमळा, तीन पातरमळे, हनुमानवस्ती, चाहूर, मुलांकी, बापसाईवस्ती, दातेवाडी, वागदरवाडी येथील वागदरवाडी गावठाणसह बाळाजीचीवाडी, मोरूजीचीवाडी, बहिर्जीचीवाडी, झापाचीवाडी, पवारवाडी यांसह पिंगोरी, आडाचीवाडी, दौंडज, राख आदी गावांमधील वाड्यावस्त्यांवर शासकीय तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या टँकरच्या दररोज खेपा सुरू आहेत.
पाणीटंचाई आराखड्यातून मुक्तता कधी?
शासनाच्या पाणीटंचाई आराखड्यातून ही गावे वर्षानुवर्षे येत असून ही गावे पाणीटंचाई आराखड्यातून मुक्त कधी होणार, हा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हेसह, आडाचीवाडी, पिंगोरी, दौंडज, वागदरवाडी, राख आदि गावातील वाड्यावस्त्यांमधील नागरिकांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
दिवसेंदिवस उष्णता वाढू लागल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागल्याने या गावांतील पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. शासन या गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी ठोस उपाययोजना करीत नाही.
मे-जूनपर्यंत पाणी टंचाईचा सामना
टंचाईग्रस्त गावांना दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. त्याचबरोबर या पाणी टंचाईग्रस्त गावे व वाड्या संभाव्य पाणी टंचाईग्रस्त असल्यामुळे पुरंदर पंचायत समिती कार्यालयाकडून हा शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाणीटंचाई निवारणासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखली जात आहे.
परिसरातील वाड्या-वस्त्या जरी शासनाच्या पाणीटंचाई आराखड्यात यंदाच्यावर्षी नोंदविल्या असल्या तरी याव्यतिरिक्त अनेक गावांना मे-जून महिन्याअखेरीस पाणी टंचाईशी सामना करावा लागणार आहे.
जलजीवन मिशन कामे अपूर्ण अवस्थेत.
पुरंदर तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जलजीवन मिशनची कामेअर्धवट अवस्थेच आहेत. पुरंदरमधील प्रशासन लोकसभा निवडणुकीत गुंतल्यामुळे या भीषण पाणीटंचाईकडे म्हणावे असे लक्ष देण्यास अधिकार्यांना वेळ नाही. सर्वत्रच पाणीटंचाई असल्याने टँकरने येणारे पाणी जरी त्यामध्ये टीसीएल टाकलेले असले तरी ते कोठून आणले जाते ते माहीत नसल्याने पाण्याच्या दर्जाबाबत साशंकता आहे.