कामशेत, (वार्ताहर) – कामशेत शहरातील काही भागात चार दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. तर काही ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील पाणीपुरवठा योजना तांत्रिक कारणांसह ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे वारंवार कोलमडत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून अशुद्ध, तर कधी अपुरा पाणीपुरवठा होत आहे. गावातील काही भागात चार दिवस पाण्याची वाट पाहण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. पाणीपुरवठा विभागाकडून होणाऱ्या अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे पाण्यावर तरंग येत आहे. तसेच पाणीही गढूळ येत आहे.
सध्या तीव्र उन्हाळा असल्याने नागरिकांना पाण्याची कमतरता जाणवत आहे. पाणीपुरवठा योजनेविषयी ठोस उपाययोजना होत नाही. परिणामी नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामारे जावे लागत आहे. तसेच दुषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांना काही दिवसांपासून हिरव्या रंगाचे व तेलकट तवंग असलेले मैलामिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प असूनही या पाण्याला मैलामिश्रित पाण्याचा वास का येत आहे.
दुषित व अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. तर काही ठिकाणी नागरिकांना टँकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. अनेक व्यावसायिक बाटली बंद पाण्याची ठरावीक किमतीपेक्षा जास्त पैसे घेऊन नागरिकांची लूट करीत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने दररोज पाणीपुरवठा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाणी पुरवठ सुरळीत न केल्या ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलांनी दिला आहे.