निगडी, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड व पुणे महापालिकेने शहरातील नागरिकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी बीआरटी संकल्पना राबविली. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून स्वतंत्र मार्ग तयार केला परंतु आज या मार्गाची, बस थांब्यांची दुरवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्च करून स्मार्ट पीएमपी बस थांबे उभारले. परंतु त्याची देखभाल दुरुस्तीकडे व सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने आज त्यांची दुरवस्था झाली आहे.
सर्वत्र पडलेला कचरा, उलट्यांची घाण, तुटलेला पत्रा, ठप्प वीजपुरवठा, उखडलेल्या फरशा अशा प्रकारची अवस्था सध्या बीआरटी मार्गिकेतील बस थांब्यांची झाली आहे. त्यामुळे हे थांबे अस्वच्छतेचे आगार बनले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च बांधलेले बस थांबे आज प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासह सुरळीत प्रवासी वाहतुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससाठी स्वतंत्र बीआरटी मार्गिका सुरू करण्यात आली.
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये ही सुविधा सुरू आहे. यासाठी ठिकठिकाणी बस थांबेही उभारले आहेत. मात्र, अनेक थांब्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. या थांब्यांवर खूप अस्वच्छता असल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिंचवड, एम्पायर इस्टेट थांब्याला काही दिवसांपूर्वी एक वाहन धडकल्याने थांब्याचा पत्रा तुटून खाली पडला. तो अद्याप तसाच आहे.
येथील वीजपुरवठाही बंद असल्याने रात्रीच्यावेळी अंधार असतो. सर्वत्र धूळ व कचरा आहे. तसेच निगडी येथील बस थांब्याची देखील दुरवस्था झाली आहे. निगडीतील कै. मधुकरराव पवळे उड्डाणपुलाजवळील थांबा हा मुख्य थांबा असून या थांब्याची तर मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी उलट्यांची घाण असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. प्रवाशांना तोंडावर रुमाल धरून बसची वाट पहावी लागते. वीज पुरवठाही सतत बंद असतो. अशीच स्थिती निगडी-दापोडी मार्गासह इतर मार्गावरील बीआरटी थांब्याचीही आहे.
बस थांब्यांचे दरवाजांची चोरी
पिंपरी चिखली मार्गावरी पूर्णानगर, शाहूनगर, स्पाइन रोड येथील बस थांबे तर फक्त नावालाच राहिले आहेत. वरील छत देखील अवजड वाहने बीआरटीतून गेल्याने उचकटले आहे. या तिन्ही बस थांब्याचे दरवाजे चोरांनी चोरून नेहले आहेत. प्रवासी गाडीत बसताना व उतरताना जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. बस थांब्याचे बोर्ड तुटून पडले आहेत. धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. त्यामुळे बीआरटीची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी आहे.
सुरक्षारक्षकांच्या केबिन धूळ खात
थांब्यांमध्ये सुरक्षारक्षकांसाठी उभारण्यात आलेल्या केबिन सध्या रिकाम्या पडून आहेत. या केबिनचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. केबिनचे काही भाग तर चोरीला गेले आहेत. अडगळीची खोली असल्यासारखी या केबिन पडून असून यामुळे प्रवाशांना थांब्याच्या दरवाजापर्यंत पोहोचताना अडथळा निर्माण होतो.
तसेच सिग्नलच्या ठिकाणी बीआरटी मार्गात सुरक्षारक्षकांसाठी केबिन बनविल्या आहेत. त्यांचा अद्याप एकदाही वापर झालेला नाही. तरी देखील बर्याच ठिकाणच्या केबिन कुजून गेल्या आहेत. काही कोलमडून पडल्या आहेत. काजा फूटून केबिनची दुरवस्था झाली आहे. परंतु बीआरटी प्रशासनाला याचे काही देणे घेणे असल्याचे दिसून येत नाही.