मुंबई – वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असताना एसटी बस थेट 400 फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या बसमध्ये 23 प्रवासी होते. पैकी एका प्रवाशाचा अपघातात मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवारी) सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला.
त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अपघातातील जखमींना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने आणि मोफत करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच, अपघातात मृत्यू पावलेल्या महिला प्रवाशाच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होईल… असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.
सध्या जखमी प्रवाशांवर वणी येथे उपचार सुरू आहेत. वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रुपयांची मदत राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत जाहीर करण्यात आली आहे.
पालकमंत्री दादा भुसे काय म्हणाले वाचा…
दादा भुसे म्हणाले, यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही.
यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः त्यांच्या संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. काहींना प्राथमिक उपचार करून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. नेमका अपघात कशामुळे झाला? हे अद्याप समजू शकलेले नाही. असं देखील ते यावेळी म्हणाले.