शिर्डी -महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले मदतीचे पॅकेज अतिशय फसवे आहे. सरकारने पॅकेजमध्ये अटी घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता अधिक असल्याची टीका माजी विरोधी पक्षनेते तथा आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
आ. विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांचा पाहणी दौरा केल्यानंतर विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप करुन जाहीर केलेल्या मदतीच्या पॅकेजवर त्यांनी नाराजी व्यक्त रकेली. बांधावर जावून यापूर्वी मदतीबाबत केलेल्या वल्गनाही महाविकास आघाडीचे नेते विसरले असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकासआघाडी सरकारच्या मार्गदर्शकांना केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिका माहीत आहेत. आपती व्यवस्थापन निधीतून केंद्र सरकार निकषाप्रमाणे मदत करेलच. परंतु केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखविण्यापेक्षा राज्य सरकारने दानत दाखवून पूर्वी केलेल्या वक्तव्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करायला हवी होती. परंतु फळबागांना 25 हजार आणि इतर पिकांच्या नुकसानीपोटी 10 हजार रुपयांची मदत जाहीर करुन महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आ. विखे पाटील म्हणाले.
सरकारकडून सामान्य माणसाच्या हिताची कोणतीच काम होत नसून, मंत्रालयातून फक्त बदल्यांचा कारभार सुरू आहे. यासाठी मेन्यू कार्ड तयार करण्यात आल्याची टीका करून आ. विखे पाटील म्हणाले, आजपर्यंत झालेल्या बदल्यांना मॅटने स्थगिती देताना आहे त्याच जागी अधिकाऱ्यांना ठेवण्याचा आदेश दिल्याकडे त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले. मंत्री बांधावर दिसण्यापेक्षा फक्त पत्रकार परिषदांतूनच दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.