पुणे – “पाच रुपयांत पाच किलोमीटरचा प्रवास या सुविधेमुळे अटल बस योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल. यामुळे शहरातील वाढती खासगी वाहनांची संख्या कमी करून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सहसा नफ्यात चालत नाही. मात्र, अटल योजनेतील स्वस्त आणि सोयीस्कर सुविधांमुळे पुणेकरांना चांगला पर्याय मिळाला आहे,’ असे मत आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या “अटल’ (अलायनिंग ट्रान्झिट ऑन ऑल लेन्स) या बससेवेचे पुणे महापालिकेच्या आवारात औपचारिक उद्घाटन पाटेल यांच्या हस्ते झाले. या योजनेंतर्गत नागरिकांना पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास केवळ पाच रुपयांत करता येणार आहे. दर पाच मिनिटांना बसेस उपलब्ध होणार असून, यासाठी 37 मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. उद्घाटनावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे, पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, पालिका आयुक्त विक्रमकुमार, पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरुरे, संचालक शंकर पवार आदी उपस्थित होते.
“रात गयी, बात गयी’
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रवेशाबाबत माध्यमांनी चंद्रकांत पाटील यांनी विचारले. त्यावेळी पाटील यांनी “रात गयी, बात गयी’ असे म्हणत अधिक बोलणे टाळले.