दुखावलेल्या जुन्या भाजप व सेनेच्या कार्यकर्त्यांची समजूत काढतांना होतेय कसरत
नगर – शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नगर शहरात युतीचे उमेदवार व शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड आपल्याकडून झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यात वेळ घालवत आहेत. निवडणुकीत प्रचार करण्यापेक्षा दुखावलेल्या जुन्या भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची नामुष्की राठोड यांच्यावर ओढावली आहे.
अनेक भाजप व शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते राठोड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होवून बाजूला गेले आहे. त्यांची पुन्हा मोट बांधण्याचे काम गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे शिवसेनेचा निवडणूक प्रचार मंदावला आहे.
राठोड यांनी तब्बल 25 वर्ष नगर शहराचे प्रतिनिधीत्व केले. पण दर निवडणूक नव्याच कार्यकर्त्यांचा संच त्यांनी उभा केला. पण आता सर्वच कार्यकर्त्यांना राठोड यांची कार्यपद्धती माहित झाल्याने नवे व जुने कार्यकर्ते त्यांच्यापासून दुरावलेच आहेत. शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी वाढलेली इच्छुकांच्या संख्येवरूनच राठोड यांचा पक्षातील करिष्मा कमी झाल्याचे स्पष्ट झाले.2014 पर्यंत नगर शहरात शिवसेनेचा उमेदवार म्हटले की राठोड यांचे नाव आघाडीवर असत. पण यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावा केला.
विशेष म्हणजे राठोड यांचे कट्टर समर्थक असलेल्या अनिल शिंदे, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. एवढचे नाही तर अन्य पक्षांतील इच्छुकांनी देखील शिवसेनेकडे उमेदवारीसाठी प्रयत्न केले. त्यामुळे राठोड यांना पहिल्यांदा पक्षातील इच्छुकांची समजूत काढून बाहेरचे अतिक्रमण रोखण्यासाठी शक्ती खर्च करावी लागली.अर्थात राठोड यांना उमेदवारी मिळाली. पण ती मिळाल्यानंतर पक्षातील नाराजांची नाराजी दूर करून मित्रपक्ष असलेल्या भाजपतील नेते व कार्यकर्त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी सध्या कसरत करावी लागत आहे.
गेल्या दहा वर्षापासून दुर गेलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अंबादास पंधारे, पाच वर्षापूर्वी राठोडांना रामराम करून राष्ट्रवादी गेलेले राजेंद्र राठोड यांनी मनधरणी करून त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्यात आले. यासह अनेक शिवसेनेचे निष्ठावंत केवळ राठोड यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षासह राठोड यांच्यापासून दुर गेलेल्यांना आज पक्षात आणण्यासाठी राठोड प्रयत्न करीत आहे.
यामुळे त्यांची शक्ती व वेळ यात खर्च होत असल्याचे दिसत आहे. त्याबरोबर मित्रपक्ष असलेल्या भाजपमधील अनेक जुने नेते व कार्यकर्ते राठोडांवर नाराज आहे. त्यांना देखील निवडणूक प्रचारात सक्रिय करण्यासाठी राठोड दरोदार फिरत आहेत. युतीच्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात वेळ जात असल्याने त्यांचा प्रचार तसा ठप्प झाला आहे.
आ. जगताप जोरात
विद्यमान आमदार संग्राम जगताप हे लोकांपर्यंत पोहचण्याची कोणीही संधी सोडत नाही. गेल्या पाच वर्षात राठोडांनी माणसे गमविली तर आ. जगताप यांनी माणसे कमविली आहे. त्यामुळे शहरासह उपनगरात आ. जगताप यांचा जोरात असल्याचे दिसत आहे. त्यात शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक जरी राठोड यांच्या बरोबर असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र हे नगरसेवक मनाने दुसरीकडेच असल्याचे दिसत आहे.