कृषी : परतीच्या पावसामुळे मावळातील 366 हेक्टर क्षेत्र संकटात
पिंपरी – गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यातील 15 हजार 647 हेक्टरपैकी 13 हजार 300 हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. त्यापैकी 12 हजार 464 हेक्टरवर भातपीक, तर सोयाबीन 366 हेक्टरवर आहे. मात्र परतीच्या पावसामुळे भुईमूग, सोयाबीन धोक्यात आले आहे. अवकाळी पाऊस भातपीक फायदा होत असला तरी वादळी वाऱ्यामुळे तयार झालेल्या पिकाला फटका बसू शकतो, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मावळ तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा दीडपट अधिक पाऊस झाला आहे. पावसामुळे खरिप हंगाम जोरात आहे. भातपिकाबरोबरच अन्य कडधान्य पिकांची चांगली वाढ झाली आहे. पवना धरण क्षेत्रात आजअखेर 3888 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पीक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीनमध्ये 40 टक्के प्रथिने आणि 19 टक्के खाद्यतेल असल्यामुळे जागतिकस्तरावर महत्वाचे पीक म्हणून सोयाबीनची गणना होते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ 58 टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकी सुमारे 60 टक्के प्रथिने सोयाबीनपासून उपलब्ध होतात. अलिकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन देणारे पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ
झालेली आहे.
भातपिकाचा सुगंध दरवळतो…
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही टप्प्याटप्प्याने पिकाला आवश्यक त्यावेळी व आवश्यक त्या प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने भातपीक जोमात आले. काही भागात झालेल्या अतिवृष्टीचा भात पिकाला फटका बसला. कृषी खात्याने केलेल्या पंचनाम्यानुसार 950 हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. सध्या काही ठिकाणी दाणे भरलेले आहेत, तर काही भागात पीक फुलोऱ्यात आहेत. मावळात यंदा शंभर एकरांवर यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड झाली आहे. सध्या बहुतांशी भागात भात पीक फुलोऱ्यात असून, सर्वत्र त्याचा सुगंध दरवळल्याचे जाणवत आहेत. तर काही ठिकाणी “ऑक्टोबर हिट’मुळे भातावर कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे; परंतु तो नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
हाताशी आलेले पीक हिरावण्याची भीती –
सोयाबीनचे पीक साधारणपणे तीन महिन्यात येते. हे पीक पूर्ण तयार झाल्यानंतर त्याची कापणी करून त्याची सुडी लावण्यात येते. मात्र सोयाबीनचे पिकाचे क्षेत्र मोठे असल्याने एकादिवसात कापणी आणि सुडी लावणे शेतकऱ्यास शक्य होत नाही. कापणी केलेले सोयाबीन पावसाने भिजल्यास सोयाबीनचे नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. आणि कवडीमोल दराने विक्री करावी लागते. पर्यायाने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. पाऊस लांबला आहे, त्यामुळे परतीच्या पावसाचा तडाखा खरिप पिकाला बसत आहे. आता पिकाची काढणी करावी की नको या द्विधा मन:स्थितीत शेतकरी अडकला आहे. त्यामुळे हाताशी आलेले पीक जाण्याची भीती व्यक्त केली आहे.