जामखेड – पूर्वी निवडणूक म्हटली की प्रचाराची धूम असायची अनेक जीवाभावाचे कार्यकर्ते पदरमोड करून उमदेवारांच्या मदतीसाठी स्वत: परिश्रम घ्यायचे. त्यावेळी प्रचारासाठी गेरू, चुना वापरून भीती रंगवायचे, उमदेवाराला दमडीसुद्धा मागत नव्हते. मात्र, आता सर्वच बदलले आहे. प्रचार आणि कार्यकर्ते ही “हायटेक’ झाले असून प्रत्यक्षात कमी परंतु, सोशल मीडियावर आपआपल्या उमेदवार, पक्ष, नेत्याची बाजू मांडताना चांगलीच चुरस रंगत आहे.
प्रत्येक निवडणुकीत प्रचाराची पद्धत बदलत गेली. गेरू व चुन्यानंतर पेंटरकडून भिंती रंगविणे सुरू झाले.काही वर्षे हा प्रकार चालला. त्यानंतर डिजीटल बॅनरचे युग आले. हा प्रकार आज ही सुरू आहे. यात अनेकदा उमेदवाराचे एकमेकांविरूद्ध डिजीटल युध्दही बघायला मिळते. हा प्रकार शहरी भागातून ग्रामीण भागात पोहोचला आहे. त्यामध्ये आता स्क्रीनवरून प्रचार, प्रसार करण्याची पद्धत आली. सोशल मीडियाचा वापर वाढला. मात्र, तो महागडा ही झाला आहे. त्यात व्हॉटसअप, फेसबुकने भर पडली आहे. सध्या घरातील प्रत्येकाकडे मोबाईल आहे. त्यात व्हॉटसऍप, फेसबुकने अनेकांना भुरळ पाडली.
एखादी पोस्ट आली की सर्वच वाचतात. या माध्यामातून त्वरीत सर्वांपर्यत पोहोचता येते. याचा लाभ निवडणुकीत घेतला जात आहे. प्रत्येक राजकीय पुढारी तथा पक्ष आता सोशल मीडिया सेलच्या नावाखाली पगारी लोकांची नेमणूक करून प्रचार करीत आहेत. काही ठिकाणी राजकीय मंडळीही स्वत: मोबाईलवरून प्रचार, प्रसार करतात. यामुळे पुर्वीचा प्रचार, प्रसार आता हायटेक झाला आहे. यात फेसबुक तथा व्हॉट्सऍपचा मोठा वापर होत आहे.