मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आज वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले.
दरम्यान, पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच फडणवीस यांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी प्रकरणावर भाष्य केलं. “राज्य सरकारला १ वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या या कार्यकाळाची प्रगती पुस्तिका म्हणजे काल सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने दिलेले दोन निकाल आहेत. सरकारी तंत्राचा मोठाच गैरवापर केला गेला. ही दमनकारी नीती आहे. हे दोन निकाल आल्यावर आता कुणावर कारवाई करणार हे आता स्पष्ट झाले पाहिजे.” अशी टीका फडणवीस यांनी केली.
काल (दि. २७) अभिनेत्री कंगना रानवातला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. कंगनाच्या घरावर केलेल्या कारवाई प्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई हायकोर्टला फटकारलंय. कंगनाच्या कार्यालयावर झालेली कारवाई अवैध असून महापालिकेने यासाठी कंगनाला नुकसान भरपाई द्यावी असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.
तर दुसरीकडे रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुसुम नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आरोप लावण्यात आले होते.