मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटाला आणि भाजपाला लक्ष्य केले जात आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच ‘हे गद्दार सरकार’ असल्याचे म्हणत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले आहे. आदित्य ठाकरेंनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना अशाच प्रकारे राज्य सरकारवर तोंडसुख घेतले होते . यासंदर्भात आज देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला एका वाक्यात उडवून लावले आहे. पत्रकारांनी उधळपट्टीसंदर्भात आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेविषयी विचारणा केली असता “ते काही उत्तर देण्यालायक नाहीये”, असे म्हणून फडणवीसांनी विषय तिथेच संपवला.
ठाकरे गटाकडून शिवसेना पक्षावरील दाव्यासाठी दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांपैकी २५० हून अधिक बाद झाल्याचे बोलले जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “निवडणूक आयोगामध्ये अशा प्रकारचे कोणतेही प्रतिज्ञापत्र लागत नाही. एखाद्या पक्षाला मान्यता देणं किंवा चिन्ह देणं याचे नियम ठरलेले आहेत. गेल्या २० वर्षांत वेगवेगळ्या आयुक्तानी त्यासंदर्भात दिलेले निर्णय प्रमाण आहेत. त्यामुळे कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत, कुणाचे रद्द झालेत, कुणाचे टिकले हे सगळं स्वत:च्या समाधानासाठी चाललंय”.