मुंबई – कुणी काहीही मागितले नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra fadanvis) दिली आहे. येत्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने (Shinde Group) 22 जागांवर दावा केला आहे. त्यावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी लोकसभेच्या 48 पैकी 22 जागा आपल्याला मिळाव्यात असे म्हटले होते. त्यानंतर भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनीही प्रतिक्रिया दिली होती. अजून जागावाटपाची चर्चा झाली नाही, तीनही पक्ष एकत्रित बसू आणि निर्णय घेऊ असे बावनकुळे म्हणाले होते. त्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी, यावर आम्ही तीनही पक्ष एकत्रित बसू आणि जागावाटपाचा निर्णय घेऊ. अद्याप कुणीही काहीही मागितले नाही, ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ, अशी प्रतिक्रीया दिली आहे.
शिवसेना शिंदे गटाने 48 पैकी 22 जागांवर दावा केला आहे. त्यामध्ये ज्या ठिकाणी 13 खासदार आहेत त्या 13 जागा भाजप सोडण्यास तयार असल्याचे सांगितले जाते. पण सत्तेत अजित पवार सामील झाल्यानंतर त्यांनाही लोकसभेच्या काही जागा द्याव्या लागतील. त्यामुळे 48 जागांचे वाटप कसे करायचे हा प्रश्न आहे. भाजपने राज्यातील 48 पैकी 45 जागा जिंकण्याचे ध्येय ठेवले आहे.