मुंबई – विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवसाची सुरुवात चांगलीच वादळी झाली. तत्पूर्वी नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप यांना शपथ देण्यात आली. धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा फडकवत दणदणीत विजय मिळवल्यानंतर ते आपल्या पहिल्याच अधिवेशनात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.
विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली. अवकाळी वृष्टीमुळे सध्या शेतकऱ्याचे बरेच नुकसान झालेलं आहे. अशात सरकारने शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहण्याची गरज असल्याचे विरोधकांचे म्हणणे होते. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. यावेळी नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी शेतकऱ्यांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हंटले.
सभात्याग केल्यानंतरसभागृहाबाहेर मीडियाशी संवाद साधताना धंगेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. मी शेतकरी कुटुंबातील आहे आणि आजही शेती करतो. शेतकऱ्याकडे वारंवार दुर्लक्ष होतंय ही गंभीर बाब आहे. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांवर विविध कर्जाचा बोजा असतो यामुळे शेतकरी दबला गेला आहे असं स्पष्ट मत धंगेकर यांनी मांडलं.
शेतकरी नेहमी काबाड कष्ट करतो. शासनाने याकडे जतीनं लक्ष घातलं पाहिजे. मुख्यमंत्री बोलतांना सर्वजण बोलतात परंतु शेतकऱ्याला न्याय मिळत नाही. एक चांगली योजना देशामध्ये राज्यात राबवायला हवी असं देखील यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले.