उपमुख्यमंत्री पवारांचे “औरंगाबाद’ प्रश्नीही भाष्य
पुणे – ‘महापालिकेच्या निवडणुका 2022 मध्ये आहेत आणि आता 2021 सुरू असून निवडणुकीसाठी वर्ष बाकी आहे. त्यामुळे कुठले निर्णय घेतले म्हणजे, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच घेतले असे होत नाही. तसेच राज्य सरकार चालवत असताना त्या-त्या वेळी जे प्रश्न येत असतात, तेव्हा निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे प्रश्न सोडवण्याचे नसतात,’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले.
विधानभवन येथे करोनाच्या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबाद नामांतराचा प्रश्नावर पवार म्हणाले, ज्यावेळी असे प्रश्न निर्माण होतात. तेव्हा महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख तीन पक्ष आहेत. त्यांनी एकत्रित बसून त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. आता हा मुद्दा पुढे आला आहे, ही वस्तुस्थिती खरी आहे. या तीन ही पक्षांचे सर्वोच्च नेते फार समंजस्य असून योग्य पद्धतीने निर्णय घेतील.
कुठल्या पक्षात कोण प्रवेश करत आहे. याची माहिती माध्यमांना वेळोवेळी होईल. पुण्यात होईल किंवा दुसरीकडे प्रवेश होईल. त्याबाबत पक्षाचे प्रवक्ते सांगतील. मेहबूब शेख प्रकरण तपास सुरू आहे, त्यात काही आतापर्यंत आढळलेले नाही. पण दोषी असेल तर कारवाई होईल, पण कोणी विनाकारण बदनामी करत असेल त्यांच्यावरही कारवाई होईल.’
ब्रिटन करोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर अधिकची खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर, मास्क व हातांची स्वच्छता तसेच सामूहिक कार्यक्रमांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री